– नदी काठावरील गावकरी नागरिकांना सर्तकतेचा ईशारा.
कन्हान : – तोतलाडोह आणि नवेगांव खैरी पेंच धरणाचे दरवाजे उघडल्याने कन्हान नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी काठावरील गावांना सर्तकतेचा ईशारा दिला आहे.
पारशिवनी तालुकासह ग्रामीण भागात मागिल काही दिवसात अधुन मधुन दमदार पाऊस सुरु आहे. तोतलाडोह आणि नवेगांव खैरी पेंच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुद्धा दमदार पाऊस झाल्याने मध्य प्रदेशातील चौराई धरणाचे दरवाजे उघडल्याने तोतलाडोह आणि पेंच धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. धरण सुस्थितीत राखण्याकरिता आणि परिस्थिती नियंत्रणा करिता मंगळवार (दि.१७) सप्टेबंर पासुन तोतलाडोह आणि पेंच धरणाचे दरवाजे उघडले आहे. दिवसभर, रात्रभर आणि बुधवार (दि.१७) सप्टेबंर ला सायंकाळ पर्यंत धरणाचे दरवाजे सुरुच असुन त्यातुन पाण्याचा विसर्ग पेंच नदीने कन्हान नदी पात्रात सुरु असल्याने कन्हान नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन नदी दुथळी भरुन वाहत आहे. बातमी लिहण्या पर्यंत धरणाचे दरवाजे सुरुच असुन नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नदी काठा जवळील गावांना आणि नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी आणि नागरिकांनी नदी पात्रात जाण्या चे टाळावे असे कडकडीचे आवाहन तोतलाडोह धरण अधिकारी देवेंद्र महादुले, नवेगांव खैरी पेंच जलाशय शाखा अधिकारी सुमित लोखंडे हयांनी केले आहे.




