spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्या ! ‘पुणे करार धिक्कार परिषदे’तून बसपाचा ऐल्गार 

– बसपच्या निळ्या झेंड्याखाली एकत्रित येण्याचे आवाहन 

पुणे :- दलित समाजावर ९ दशकांपूर्वी झालेला अन्यायकारक भूतकाळ पुसून टाकण्याची वेळ आली आहे. ‘पुणे करार’तुन बहुजनांचे राजकीय प्रतिनिधित्व ‘राखीव मतदार’संघापूरते मर्यादीत ठेवण्यात आले. पंरतु, आता दलितांसाठी ‘स्वतंत्र मतदारसंघ’ देवून मोहनदास करमचंद गांधी आणि कॉंग्रेसने मुद्दाम केलेली चूक दुरूस्त करावा, अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या वतीने आयोजित ‘पुणे करार धिक्कार परिषदे’त एकसुरात करण्यात आली.

बुधवारी (ता.२४) येरवड्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, महाराष्ट्राचे केंद्रीय समन्वयक,माजी खासदार राजाराम, प्रदेशाध्यक्ष ऍड.सुनिल डोंगरे, प्रदेश प्रभारी रामचंद्र जाधव, प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.पुणे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी परिषदेचे सूत्रसंचलन केले.

दलित, शोषित, उपेक्षितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी विश्वरत्न डॉ.आंबेडकरांनी दिलेला लढा सर्वश्रुत आहे. बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत इंग्रजांशी संघर्ष आणि बौद्धिक युक्तिवाद करून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघ मंजूर करून घेत ‘द्वीमतदानाचा’ अधिकार मिळवून दिला होता.कायदेमंडळ, विधीमंडळात दलित समाजाच्या हिताचे कार्य करणारे, खरे प्रतिनिधी स्वतंत्र मतदार संघामुळे त्यामुळे निवडून जाणारे होते. पंरतु, कॉंग्रेस व गांधींना अस्पृशांना मिळालेला स्वतंत्र मतदार संघाचा अधिकार मान्य नव्हता.दलित विरोधी मानसिकतेतून गांधींनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केल्यानंतर देशहित लक्षात घेता बाबासाहेबांनी पुणे करारावर स्वाक्षरी केली.हाच ‘पुणे करार’ दलितांच्या अधिकारांवर घाव ठरला,असे प्रतिपादन राजाराम यांनी केले.

महामानव डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत असलेली ‘शासनकर्ती जमात’ होण्यासाठी बहुजनांना एकाच निळ्या झेंड्याखाली एकत्रित यावे लागेल.’हत्ती’ निवडणुक चिन्ह असलेल्या बसपच्या निळ्या झेंड्याखालीच बहुजन चळवळीला सुगीचे दिवस आले. याच झेंड्याखाली बहुजन समाजकारणासाठी सत्तारुढ होवू शकतो, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष ऍड.सुनिल डोंगरे यांनी केले.

दलितांना न्याय्य हक्कापासून गांधींनी वंचित ठेवले!

पुणे करार करून गांधीनी दलितांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्पष्ट मत होते. गांधींचे आमरण उपोषण म्हणजे दलितांना त्याच्या न्याय्य हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी केलेले एक नाटक होते असे डॉ.बाबासाहेब म्हणाले होते, याची प्रचिती आज पदोपदी येते. गांधीच्या दलित विरोधी मानसिकतेतूनच काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी दलितांचे शोषण केले.आता बीएसपी ला राजकीय बळ देऊन या मानसिकतेला धडा शिकवण्याची वेळ आली आहे,असे आवाहन प्रदेश महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.