spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कर्णिका नदीच्या काठावर गंगा महाआरती’चा भव्य सोहळा

– जनसागर उसळला चिमुरड्यांनी दिला ‘जल संरक्षणाचा’ संदेश 

कामठी :- गंगा दसऱ्याच्या पावन पर्वावर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक प्रमुख धार्मिक केंद्र असलेल्या येथील स्थानिक कन्हान (कर्णिका) नदीच्या महादेव घाटावर सोमवार संध्याकाळी ‘श्री गंगा महाआरती’चे अत्यंत भव्य आणि नयनरम्य आयोजन करण्यात आले होते. असीम श्रद्धा, अलोट उत्साह आणि भक्तीच्या वातावरणात हजारो भाविकांनी या सोहळ्यात हजेरी लावली. असंख्य दिव्यांच्या प्रज्वलनाने नदीचा परिसर उजळून निघाला होता, ज्यामुळे घाटावरील निसर्ग सौंदर्य अधिकच मनमोहक आणि विलोभनीय दिसत होते.

नगर परिषद अध्यक्षांच्या हस्ते पूजा व महाआरती

या मंगल प्रसंगी नगर परिषदेचे अध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांनी आई गंगा मातेची पूजा-अर्चा करून भव्य महाआरती केली. याप्रसंगी त्यांनी समस्त कामठी नगरवासीयांच्या सुख, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

पूजा अर्चा आणि वैदिक

मंत्रोच्चाराच्या सुरावलींनी संपूर्ण महादेव घाट परिसर दुमदुमून गेला होता. महाआरतीनंतर सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

या भव्य धार्मिक सोहळ्याला कामठी परिसरातील अनेक गणमान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी आवर्जून हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने कामठी भाजप अध्यक्ष मंगेश यादव, गंगा आरती समितीचे अध्यक्ष रवि चमके,कमलकिशोर यादव,प्रमेन्द्र यादव, कपिल गायधने,विजय कोंडुलवार,चंद्रशेखर तुप्पट राजेश खंडेलवाल, प्रकाश सुखीजा मुरलीधर अग्रवाल, महेश अग्रवाल, मोंटू भूटानी कपिल गायधने, चंद्रशेखर तुप्पट, दिनेश बिल्लंवार राजेश देशमुख, नरेश कलसे, आशु अवस्थी अथर्व पिंगळे, धीरज सोलंकी, पंकज यादव नितीन रावेकर, मनीष कनोजिया, चंद्रकांत सीरिया आणि बबलू रोचलानी यांच्यासह गंगा आरती समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक सपरिवार उपस्थित होते.

“जल है तो कल है– चिमुरड्यांनी दिला जलजागृतीचा संदेश

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण गायत्री परिवारातर्फे चालवल्या जाणाऱ्या ‘निशुल्क बाल संस्कार शाळे’चे विद्यार्थी ठरले. वेगवेगळ्या शाळांमधून आलेल्या या लहान मुलांनी ‘जल जन जागृती’वर आधारित एक सुंदर सामूहिक ॲक्शन गीत सादर केले.

मुलांनी “आम्ही पाणी तयार करू शकत नाही, पण वाचवू तर शकतो”, “गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा” अशा १८ पर्यावरणपूरक घोषणांचे फलक हातात धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भाविकांना दिली शपथ: या चिमुरड्यांनी उपस्थित सर्व भाविकांना हात पुढे करायला लावून, “आयुष्यात कधीही कोणत्याही जलस्रोताला दूषित करणार नाही आणि पाण्याचा अपव्यय रोखू,” अशी सामूहिक शपथ दिली.

गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या “बच्चे करेंगे युग निर्माण” या विचारांना सार्थ ठरवत मुलांनी कमी वेळेत दिलेला हा संदेश उपस्थितांच्या मनाला भिडला आणि सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलांचे कौतुक केले. मुलांच्या पालकांनीही दीपप्रज्वलनात सक्रिय सहभाग घेतला.

नदी परिसर स्वच्छ ठेवण्याचा नागरिकांचा संकल्प

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कामठी परिसरातील नागरिकांना या भव्य महाआरतीची मोठी उत्सुकता होती. नागपूर ग्रामीण भागात नदी घाटावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे हे कदाचित एकमेव भव्य आयोजन असल्याने येथे दुपारपासूनच महिला, पुरुष आणि बालकांची मोठी गर्दी झाली होती. या धार्मिक उत्सवाचे औचित्य साधून केवळ पूजेपुरते मर्यादित न राहता, संपूर्ण कन्हान (कर्णिका) नदी परिसर आणि घाट नेहमी स्वच्छ व प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा संकल्पही स्थानिक नागरिकांनी आणि समितीने एकमुखाने केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गंगा आरती समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी अतोनात परिश्रम घेतले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.