किशोर साहू, मौदा :- जुलै महिन्यातील राशन घेण्यासाठी मौदा तालुक्यातील कोदामेंढी व तुमान सह इतर गावातील राशन कार्डधारक राशन घेण्यासाठी राशन दुकानात गेले असता राशन दुकानदार आयुष्यमान कार्ड आणायला सांगतो व ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे त्यांनाच राशन देतो. ज्यांच्याकडे आयुष्यमान कार्ड नाही त्यांना या महिन्यापासून राशन घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड अनिवार्य असल्याने आधी आयुष्यमान कार्ड काढा नंतरच राशन घ्यायला या असे सांगत आहे. तर ज्या राशन कार्ड धारकांकडे आयुष्यमान कार्ड नाही असे राशन कार्ड धारक आयुष्यमान कार्ड काढायला गेले असता, ग्रामपंचायतचे ऑपरेटर आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल लिंक असणे अनिवार्य असल्याचे सांगतो .ज्या राशन कार्ड धारकांच्या आधार कार्डशी मोबाईल लिंक नाही त्यांना आधी आधार केंद्रावर मोबाईल लिंक करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर चकरा माराव्या लागत असल्याचे तुमान येथील नागरिकांनी सांगितले.
मात्र आज गुरुवार (ता. 16 जुलै )मौदा तालुक्यातील सीमेलगत व पारशिवनी तालुक्याअंतर्गत येत असलेल्या निलज येथे सकाळी साडेदहा वाजता दरम्यान राशन कार्ड धारकांना धान्य वाटप करीत असताना राशन दुकानदार हटवार यांना विचारपूस केली असता, त्यांनी राशन कार्ड धारकांना राशन देण्यासाठी आयुष्यमान कार्ड ची अट अनिवार्य नसल्याने मी सर्वांनाच आयुष्यमान कार्ड असणाऱ्यांना व आयुष्यमान कार्ड नसणाऱ्यांना राशन वाटप करत असल्याचे सांगितले.
मौदा व पारशिवनी हे दोन्ही तालुके नागपूर जिल्ह्यात येतात. एका जिल्ह्यातील दोन तालुक्यात राशन घेण्यासाठी वेगवेगळे नियम असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे व ज्यांना वेळेवरच आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी कधी विद्युत पुरवठा बंद असल्याने तर कधी लिंक नसल्याने आयुष्यमान कार्ड बनवणाऱ्या व आधारकार्ड मोबाईलची लिंक करणाऱ्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत असल्याने , मौदा तालुक्यातील आयुष्यमान कार्ड नसलेले राशन कार्डधारक मात्र चिंताग्रस्त दिसले.




