– लाभ सुनिश्चित करा! शेतकऱ्यांना तहसीलदार निलेश कदम यांचे आवाहन
– DCS ॲपद्वारे पीक नोंदणी अनिवार्य; पीक विमा, कर्ज, आपत्ती मदत व MSP लाभासाठी संधी दवडू नका
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत AgriStack संकल्पनेनुसार ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS) ही रब्बी हंगाम २०२६ साठी अत्यंत महत्त्वाची असून शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी आता खूपच कमी वेळ शिल्लक आहे. साकोलीचे तहसीलदार निलेश कदम यांनी शेतकरी बांधवांना कळकळीचे आवाहन केले आहे की, शासन निर्णय व संबंधित पत्रांनुसार रब्बी हंगामाकरिता दिनांक १० डिसेंबर २०२५ पासून पीक नोंदणीला सुरुवात झाली असून शेतकरी स्तरावरील अंतिम मुदत २४ जानेवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे. शासनाने ठरवून दिलेल्या विहित मुदतीत आपली पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी.
ई-पीक पाहणी केल्यास शेतकऱ्यांना अनेक महत्त्वाचे फायदे मिळतात. पीक विमा योजनेचा लाभ, पीक कर्ज मिळविणे सुलभ होते, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मदत वेळेत मिळते, तसेच किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत पिकांची अधिकृत नोंद होते. यासोबतच AgriStack अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व कृषी योजना आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळतो.
साकोली तहसीलदार निलेश कदम यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या शेतातील पिकांची ई-पीक पाहणी ठरलेल्या मुदतीत पूर्ण करावी. शेतकरी स्वतःच्या मोबाईलद्वारे Google Play Store वर उपलब्ध असलेल्या DCS ॲपच्या माध्यमातून पीक नोंद करू शकतात. यानंतर सहायक स्तरावरील पीक पाहणीचा कालावधी २५ जानेवारी ते १० मार्च २०२६ असा राहणार आहे.
तहसीलदार निलेश कदम यांनी स्पष्ट केले की, “कृषी शासकीय लाभासाठी ई-पीक पाहणी अनिवार्य आहे. वेळेत पीक नोंदणी केल्यास भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.” त्यामुळे शेतकऱ्यांनी Google Play Store वर उपलब्ध DCS मोबाईल ॲपद्वारे तात्काळ पीक पाहणी पूर्ण करून आपले हक्काचे शासकीय लाभ सुनिश्चित करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.




