नागपुर :- देशाच्या विकासात मोलाचे योगदान देणा-या व मुनाफ्यात चालणा-या एलआयसीचे भागभांडवल विकू नका, विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीत वाढ त्वरित थांबवा, चार लेबर कोड बिल त्वरित रद्द करा, विमा कायदा १९५६ मध्ये सुधारणा करू नका,एलआयसीत नोकरभरती त्वरित सुरू करा, जुनी पेंशन योजना पूर्ववत सुरू करा इ. प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व जनतेच्या हिताचे रक्षण करण्याकरिता भारतीय आयुर्विमा महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी देशातील प्रमुख संघटनांनी पुकारलेला सार्वत्रिक संप आज एल आयसीत शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा कामगार नेते अनिल ढोकपांडे यांनी केला.

भारतीय आयुर्विमा महामंडळ विभागीय कार्यालय नागपुर व २८ शाखा कार्यालयातील कर्मचारी संपावर गेल्याने रोखीच्या व्यवहारासह सर्व सेवा ठप्प झाल्याने कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट दिसत होता. भारतीय आयुर्विमा मुख्यालयासमोर आज बॅंक व विमा कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे द्वारसभा व जोरदार निदर्शने केली. यावेळी ज्येष्ठ कामगार नेते रमेश पाटणे, टि.के.चक्रवर्ती, अनिल ढोकपांडे, संजय मिश्रा,अजय बोभाटे आदिंनी बहुसंख्येने उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. संचालन संघटनेचे सरचिटणीस वाय.आर.राव यांनी तर उपस्थितांचे आभार शिवा निमजे यांनी मानले.व्दारसभेला विमा व बॅंक कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सर्वश्री हिना जिभकाटे, राजेश विश्वकर्मा, अभय पाटणे, राजेश खंडेलवाल, मनोहर पवनीकर, संदिप लातूरकर, विवेक जोशी, अभय पांडे आदींनी सहकार्य केले.




