– खरीप हंगाम पुर्वतयारी आढावा सभा
हंसराज, भंडारा :- यावर्षी एलनिनोमुळे सदृष्य दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत असल्यामुळे अंदाजित पर्जन्यमानानुसार पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचे वर्तविल्या जात असल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिषद कक्षात आज पालकमंत्री भोयर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पुर्वतयारी आढावा सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते दुरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. सभेला खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी सावन कुमार, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संगीता माने तसेच जिल्ह्यातील सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते, तर दुरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष कविता उईके उपस्थित होत्या.
भोयर यांनी नुकत्याच आलेल्या अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे यावेळी निर्देश दिले. खरीप हंगामाच्या नियोजनानुसार अपेक्षित लागवडीप्रमाणे मुबलक प्रमाणात बी-बियाणे, खते-निविष्ठा, किटकनाशके यांची उपलब्धता असली पाहिजे. यात काही कमतरता असल्यास त्याचीही पूर्तता करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने तयारी ठेवावी.
जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच कृषी दुकानदारांची बैठक घेऊन बोगस बी-बियाणे विक्रीला चाप लावण्याच्या सूचना द्याव्यात. कृषी विभागाने याबाबत भरारी पथकांवर नियंत्रण ठेवावे. तसेच भरारी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सजग राहून बोगस बी-बियाणे विक्रेत्यांवर अकुंश लावण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री भोयर यांनी दिले.
खते, बी-बियाणे व किटकनाशके विक्रीनंतर दुकानदारांनी शेतकऱ्यांना पक्के बिल द्यावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. रेशीम व कृषी विभागाने शेतकरी प्रशिक्षणाचे नियोजन करावे तसेच रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करावे असे निर्देश भोयर यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये कृषि निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर एक भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी. जिल्हा व तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात यावी. तसेच जिल्ह्याचा तक्रार निवारण कक्षाचा Dedicated भ्रमणध्वनी जाहीर करण्यात यावा असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात खरीप हंगाम पिकाखालील क्षेत्र 1,98,097 हेक्टर असून यामध्ये भात, तुर, ऊस, भाजीपाला, सोयाबिन, कापूस, हळद व इतर मसाला पिके, तीळ व इतर पिके घेतली जातात. त्यामुळे खरीपाची पेरणी करण्यासाठी पाण्याचे सुक्ष्म नियोजन करण्याचे सांगितले. प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांनी काढावा जेणेकरून त्यांना अडचणीच्या वेळी दिलासा मिळतो. ही मदत शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी ठरते. त्यामुळे पीक विमा काढावा असे भोयर यांनी सांगून कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण करावी, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणी येणार नाही आणि निर्धारित दरावर त्यांना बियाणे मिळतील याची तपासणी योग्य प्रमाणे करावी असे सांगून खतांचा काळाबाजार आढळल्यास दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना भोयर यांनी यावेळी केल्या.
रेल्वे रॅक पॉईंट सुरु करण्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी या कामाला प्राधान्य देवून हे काम पुर्ण करावे.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक कक्ष स्थापन करण्यात यावे असे सांगून भोयर म्हणाले, धान खरेदी, मक्याची खरेदी, रेल्वे रॅक पॉईंट सुरु करणे, पीक कर्ज वाटप, शेतकऱ्यांना खताबाबतचे नियोजन, बोगस बियाणांवर अंकुश ठेवणे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, तसेच एलनिनोमुळे सदृष्य दुष्काळ परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत असल्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, असे त्यांनी निर्देश दिले.
या बैठकीला खासदार पडोळे व आमदार कारेमोरे यांनीही काही बाबी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिल्यात. त्यासंदर्भात योग्य दखल घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश भोयर यांनी दिलेत. या कार्यक्रमाचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संगीता माने यांनी केले.