कामठी :- मुलगी वाचवा, मुलगी शिकवा या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत तसेच बालविवाहमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने कामठी तालुक्यात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅलीचे आयोजन तालुका विधी सेवा समिती व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या प्रसंगी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या रथाच्या माध्यमातून बालविवाह प्रतिबंध, मुलींचे शिक्षण, आरोग्य, संरक्षण व कायदेशीर हक्क याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
रॅलीमध्ये “बालविवाह बंद करा”, “मुलींना शिक्षणाची संधी द्या”, “कायदा पाळा – बालविवाह टाळा” अशा आशयाच्या घोषणा देत नागरिकांना संदेश देण्यात आला. शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी, महिला बचत गट सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमा मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे सचिव तथान्यायाधीश जिल्हा न्यायालय नागपूर तालुका विदास विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश कामत , शेरेकर , नवीन कामठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश आंधळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुनील मेसरे , जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण, बालकल्याण समितीचे अध्यक्ष छाया राऊत व इतर सदस्य सहभागी झाले होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, बालविवाह हा गुन्हा असून त्याचे गंभीर सामाजिक व कायदेशीर परिणाम आहेत. मुलींच्या शिक्षणावर भर दिल्यास समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. बालविवाह रोखण्यासाठी नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या उपक्रमामुळे कामठी तालुक्यात बेटी बचाव बेटी पढाव व बालविवाहमुक्त अभियान याबाबत व्यापक जनजागृती होण्यास निश्चितच मदत होणार आहे. सदर कार्यक्रमांमध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका, शासकीय अशासकीय कर्मचारी शाळेतील मुलं, नगर परिषदेतील कर्मचारी, तहसील कार्यालयातील कर्मचारी ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.




