– आमचा संगतीत- पंगतीत राहिलेला मातंग समाज दूर जाऊ शकत नाही – नारायण बागडे
नागपूर :- लोकशाहीर तथा साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बौद्ध, मातंग, चर्मकार व वाल्मीकी भाईचारा ऐक्य संदेश अभियान अंतर्गत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चातर्फे अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात आंरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी समाजातील ऐक्य व सामाजिक परिवर्तनावर भाष्य केले. यावेळी बोलतांना नारायण बागडे म्हणाले, “ज्यांना कधीकाळी आमच्या सावलीचाही विटाळ वाटत होता, त्यांच्याकडून भाकरीचा तुकडाही मिळणे दूरची गोष्ट होती. अशा काळात आमचा पूर्वीचा महार समाजच आमचा सखा ठरला. त्यांनी आम्हाला संगतीत आणि पंगतीत स्थान दिले, हा इतिहास विसरता कामा नये. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ हा परिवर्तनाचा संदेश दिला. मात्र आजही काही लोक हा संदेश मनापासून स्वीकारत नाहीत,” असे मार्मिक उद्गार त्यांनी काढले. या अभियानाचे नेतृत्व आंबेडकरी मातंग मोर्चाचे मनोहर इंगोले, वाल्मीकी समाजाचे नेते रमेश डकाह, चर्मकार समाजाचे नेते अँड. राजकुमार शेंडे तसेच प्रा. रमेश दुपारे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी जयदेव चिंवडे यांच्या हस्ते साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रवीण आवळे, चरणदास गायकवाड, राजू पांजरे, के. टी. कांबळे, नरेश खन्ना यांच्यासह विविध समाजघटकांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





