कुही ८ :- शेतातील कामे आटोपून आभाळ गडगड करत असल्याने घराकडे दुचाकीने परत जात होते. दरम्यान गावापासून काही अंतरावर असताना अचानक दुचाकीवर वीज पडल्याने मायलेक गंभीर जखमी झाले असून उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी तालुक्यातील वग येथील रहिवासी दशरथ मेश्राम हे पत्नी सुनिता व मोठा मुलगा धम्मशील व लहान मुलगा धम्मदीप असे चौघेही त्यांच्या वग शिवारातील शेतात गेले होते. दरम्यान शेतातील काही कामे केल्यानंतर आभाळ गडगडू लागल्याने दुपारी 3.30 च्या दरम्यान वडील दशरथ मेश्राम व लहान मुलगा धम्मदीप हे घरी निघून आले. तर पत्नी सुनिता व मोठा मुलगा धम्मशील हे शेतातील पराठीच्या तासातील तन काढत होते. नंतर ते दोघेही मायलेक त्यांच्या येथील एक्टीवा गाडीने शेतातून गावाकडे परत येत असताना गावापासून अंदाजे ७०० मीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. त्याने दोघेही गंभीर जखमी झाले. रस्त्याने येत असलेल्या लोकांना ते रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसून आले. लागलीच त्यांना मांढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. व तिथून पुढील उपचारासाठी कुही येथील ग्रामीण रुग्नालयात रेफर केले असता तेथील डॉक्टरांनी सुनिता दशरथ मेश्राम (वय-४०) व धम्मशील दशरथ मेश्राम (वय-२१ ) दोन्ही मायलेकांना तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




