हंसराज, भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील बेटाला येथे दुपारी निसर्गाच्या कोपाने एका कष्टकरी शेतकऱ्याचा बळी घेतला. आपल्या कुटुंबासह शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने रामकृष्ण तुकडू देशमुख (वय ५५ वर्ष) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बेटाला गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण देशमुख हे आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास आपल्या कुटुंबासह शेतात खरीप हंगामातील कामासाठी गेले होते. यावेळी आकाशात अचानक ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. काही समजण्यापूर्वीच एक जोरदार वीज रामकृष्ण यांच्या अंगावर कोसळली. ही वीज इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंब थोडक्यात बचावले अत्यंत हृदयद्रावक बाब म्हणजे, ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी रामकृष्ण यांच्या अगदी जवळच त्यांचे कुटुंबीय आणि शेजारीच त्यांची म्हैस देखील होती. सुदैवाने कुटुंबातील अन्य सदस्य यातून थोडक्यात बचावले असले, तरी आपल्या डोळ्यादेखत कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पोलीस आणि प्रशासकीय कारवाई घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. एका प्रगतशील आणि मेहनती शेतकऱ्याच्या जाण्याने देशमुख कुटुंबावर आभाळ फाटले असून, सरकारने या गरीब कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.




