अमरावती १९ : अमरावती जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ रचनेची घोषणा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून, आता २२ ऑगस्ट २०२५ रोजी विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते अंतिम रचना जाहीर केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही जबाबदारी विभागीय आयुक्तांना सोपवली आहे. यापूर्वी आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांनी अमरावतीसह अन्य जिल्ह्यांना भेट देऊन निवडणूक तयारीचा आढावा घेतला होता. या काळात नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. या हरकतींचा आणि सूचनांचा परिणाम अंतिम रचनेवर निश्चितच दिसून येणार आहे. नवीन मतदारसंघ रचनेत महत्वाचे बदल झाले असून, चांदूर रेल्वे तहसीलमधील एक मतदारसंघ कमी करण्यात आला आहे, तर अचलपूर तहसीलमध्ये एक नवीन मतदारसंघ वाढवण्यात आला आहे. याशिवाय, मेळघाट वगळता बहुतांश मतदारसंघांची नावे बदलण्यात आली आहेत. काही भागांमध्ये जवळील गावे वगळून दूरच्या गावांचा समावेश केल्याने नागरिकांनी आक्षेप नोंदवले आहेत. पूर्वी ही जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे होती. मात्र आता, ग्रामीण विकास विभागामार्फत विभागीय आयुक्त अंतिम निर्णय घेणार आहेत. या नव्या रचनेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना गती मिळणार आहे.




