कामठी :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभर विशेष सखोल मतदार यादी पुनरिक्षण (SIR) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तहसीलदार गणेश जगदाळे यांनी ग्रामपंचायत खैरी येथे भेट देऊन मतदार पुनरिक्षण प्रक्रियेचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांना SIR अभियानाचे महत्त्व, मतदार नोंदणी, नाव पडताळणी तसेच आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती दिली. कोणताही पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी ग्रामपंचायत खैरीच्या सरपंच योगिता किशोर धांडे, पटवारी प्रतीक कास्टे, बीएलओ तसेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




