वर्धा १६ : स्वातंत्र्यदिनी वर्धा येथे एक मोठी दुर्घटना टळली. सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) कार्यालयासमोर कंत्राटदार बाबा झाकीर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. सरकारकडून थकीत बिल न मिळाल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
गेल्या अनेक दिवसांपासून ते वारंवार बिलांसाठी विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत होते. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. अखेर १५ ऑगस्ट रोजी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.
याबाबत माहिती आधीच मिळाल्यामुळे पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी पोहोचून त्यांचा जीव वाचवला. या प्रसंगी बोलताना झाकीर यांनी आपले दुःख व्यक्त करताना सांगितले की, “अनेक नेत्यांनी कंत्राटदारांच्या जीवावर निवडणुका जिंकल्या, पण आता आम्ही मृत्यूच्या तोंडात आहोत.”
या घटनेने सरकारच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणात शासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




