नागपूर, दि. २ : केंद्र शासनाद्वारे ‘सुधारीत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2025’ ला 14 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून नागपूर विभागातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या योजनेत सहभाग घ्यावा,असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम-2025 मध्ये सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 होती. मात्र, अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी नसणे, पीएमएफबीवाय पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार व सीएससी सर्व्हरवरील व्यत्यय आदि तांत्रिक अडचणींमुळे या योजनेतील शेतकऱ्यांच्या सहभागावर परिणाम लक्षात घेता.केंद्र शासनाच्या 1 ऑगस्ट 2025 रोजीच्या निर्देशानुसार योजनेत अधिसूचित खरीप पिकांकरीता बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी 14 ऑगस्ट 2025 व कर्जदार शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
www.pmfby.gov.in पोर्टलवर स्वत: शेतकऱ्यांनी तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप सामुहिक सेवा केंद्र सीएससी यांच्या मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करावी, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.




