spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– मुख्यमंत्री वॉर रुम अंतर्गत आरोग्य विषयक योजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

– केंद्र-राज्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी; समन्वयातून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई :- राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यातील आरोग्यसेवा परिणामकारक, दर्जेदार आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत प्रधानमंत्री आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि प्रयोगशाळांच्या उभारणीची कामे निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करावीत,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या पाठपुराव्यासाठी मुख्यमंत्री वॉररुमची स्थापना करण्यात आली आहे. या वॉर रुम अंतर्गत आरोग्य विभागाच्या केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव निपुण विनायक, आयुक्त कादंबरी बलकवडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पायाभूत आरोग्य सुविधा बळकटीकरण, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन, नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी एचपीव्ही लसीकरण मोहीम आदींसह विविध प्रलंबित कामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात दर्जेदार व सहज उपलब्ध आरोग्य सेवा निर्माण करण्यावर शासनाचा विशेष भर आहे. यासाठी तमिळनाडूसह विविध राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. केंद्र शासनाकडून मिळणारा निधी निर्धारित वेळेत खर्च होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिर उभारणे, क्रिटिकल केअर ब्लॉक व एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा यांची कामे वेगाने करण्यासाठी लक्ष घालावे. सुरुवातीच्या काळात कामांमध्ये विलंब होत होता; मात्र आता जिल्ह्यांची कामगिरी समाधानकारक असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

काही जिल्ह्यांची प्रगती तुलनेने कमी असली तरी सर्व जिल्ह्यांनी आता निश्चित केलेल्या वेळापत्रकात काम पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रीत करावे. प्रलंबित प्रकल्पांमध्ये विभागांमधील समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी शासन म्हणून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे पूर्ण करावीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आरोग्य क्षेत्राला कमी प्राधान्याचे क्षेत्र समजण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. शासनाच्या आरोग्य सुविधांमध्ये गुणवत्ता, स्वच्छता आणि चांगले ब्रँडिंग असावे. शासकीय दवाखाने म्हणजे अस्वच्छ किंवा निकृष्ट ही नागरिकांची धारणा बदलण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. मॉड्युलर तंत्रज्ञानामुळे दर्जेदार आणि वेळेत काम शक्य होत असल्याने अधिकाऱ्यांनी कल्पकतेने काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

पुण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आलेल्या सकारात्मक बदलाचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा चांगल्या उपक्रमांचा इतर ठिकाणीही अवलंब व्हायला हवा. नागरिकांना शासकीय आरोग्य व्यवस्थेमध्ये गुणवत्ता जाणवली पाहिजे, यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारून लक्ष घालावे.वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीमधील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या मुदतींची नोंद करण्यात आली आहे. पुढील वॉर रूम बैठकीत त्याचा आढावा घेतला जाणार असून अधिकाऱ्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे आवश्यक राहील.

प्रश्न प्रलंबित ठेवू नका, पाठपुरावा वाढवा, असे स्पष्ट निर्देश देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एखादा प्रश्न आपल्या स्तरावर सुटत नसेल तर विभाग प्रमुख, सचिव, मुख्य सचिव, मंत्री किंवा मुख्यमंत्री स्तरापर्यंत विषय मांडावा; मात्र काम पूर्ण होईपर्यंत शांत बसू नये. सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यास कोणतीही समस्या सुटू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी सर्व्हायकल कर्करोग प्रतिबंधासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राला जवळपास दहा लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जिल्हास्तरावर पालकांची संमती घेऊन व्यापक जनजागृती मोहीम राबवावी आणि लक्ष्य वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

राज्यात नवीन 13 वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या महाविद्यालयांच्या उभारणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामे वेगाने पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्यात यावे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना गती देण्यात येत असून या यंत्रणा लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या दोन्ही प्रकल्पांना प्राधान्य दिले जात आहे. आरोग्य सुविधा बळकट करणे हा शासनाचा मुख्य उद्देश असून नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरांवर काम सुरू आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर उपक्रमाच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेतला जात असून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या (पीएचसी) उन्नतीकरणामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच, वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांमुळे आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ वाढीस मदत होणार आहे. महापालिका व नगरपालिकांशी संबंधित प्रलंबित बाबींमध्ये नगरविकास विभागाने अधिक जबाबदारीने काम करत अडचणी दूर कराव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय साधून प्रकल्पांची अंमलबजावणी जलद गतीने करावी, असेही त्यांनी सांगितले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषांमुळे काही ठिकाणी रुग्णालय उभारणीस अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. आवश्यक त्या बदलांना मान्यता देऊन रुग्णालय बांधकामात अडथळे येऊ नयेत, यासाठी योग्य त्या स्तरावर निर्णय घेण्यात यावेत. काही ठिकाणी प्रकल्प पूर्णत्वास आले असले तरी पिण्याचे पाणी, रस्ते यासारख्या मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबींमध्ये तातडीने लक्ष घालून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होतील, याची खात्री करावी.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी/पीएसी) अधिक सक्षम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उन्नतीकरण करण्यात येत आहे. राज्यात एकूण ५५ पीएसी केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे. आय, ओ आणि जी+१ अशा तीन प्रकारच्या जुन्या केंद्रांचे पुनर्रचना करून त्यांना आयपीएसीच्या मानकांनुसार विकसित करण्यात आले आहे. यामध्ये आवश्यक पायाभूत सुविधा, ब्रँडिंग तसेच आधुनिक स्वरूप देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रधानमत्री जनआरोग्य योजनेची व्याप्ती प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सक्षमपणे वाढविली तर नागरिकांना चांगली सेवा देता येईल.

राज्यात सध्या महानगरपालिका क्षेत्रात ११४१ तर नगरपालिका क्षेत्रात ७९७ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत आहेत. त्यातून नगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत ४६ लाख व महानगरपालिका क्षेत्रात ४३ लाख बाह्यरुग्णांना सेवा देण्यात आली आहे. तसेच प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनअंतर्गत राज्यात ३६ क्रिटिकल केअर ब्लॉक उभारण्यास मंजुरी मिळाली असून त्यांची कामे सुरू आहेत. तसेच ३६ एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांपैकी २२ प्रयोगशाळा पूर्ण झाल्या असून ४ प्रयोगशाळांचे काम प्रगतीपथावर आहे. ऊर्वरित प्रयोगशाळांच्या कामे गतीने पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.