सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- रामटेक आगाराला गेल्या कित्येक महिन्यांपासून बसेसच्या कमतरतेची समस्या मोठया प्रमाणावर भेडसावत असून त्यामुळे आगाराचे नियोजन कोलमडले आहे. आगारातील बस फेऱ्यांवर परिणाम होत असल्याने प्रवाशी व विद्यार्थ्याचे मोठया प्रमाणात हाल होत आहेत. सद्या स्थितीत रामटेक आगाराला ४५ बसेस आहेत. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. नागपूर, मौदा आणि तुमसर या मार्गांवर बसांच्या कमतरतेमुळे लांबच लांब रांगा लागत आहेत.
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने बसला होणारी गर्दी लक्षात घेता रामटेक बसस्थानक आगार प्रशासनाने प्रवाशांना तत्पर सेवा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे होते; परंतु, तसे होताना दिसून आले नाही. ‘भाऊबीज’साठी महिला प्रवासी माहेरी जाण्यासाठी बसस्थानकावर प्रतीक्षेत आहेत. महिलांना, जेष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा असली तरी बस वेळेवर न आल्याने त्याचा लाभ मिळत नाही. नागपूरसाठी दर १५ मिनिटांनी बस असावी, अशी प्रवाशांची मागणी आहे, परंतु बसेस वेळेवर न सुटल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. दरवर्षी शासन धोरणानुसार १५ वर्षांपेक्षा जुनी वाहने भंगारात पाठवली जातात, परंतु त्याऐवजी नव्या बस मिळत नाहीत. यामुळे विद्यार्थी, नोकरी करणारे वर्ग आणि ग्रामीण भागातील प्रवासी यांना वेळेत आपल्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ नवीन बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.




