नागपूर, ता. ७ : नागपूर महानगरपालिकेचे ‘अमृत महोत्सवी वर्ष आणि केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा २०२५’ या अभियानांतर्गत रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात रांगोळी आणि तिरंगा प्रदर्शनीचे बुधवारी (ता.६) थाटात उद्घाटन करण्यात आले. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर आणि बाल कला अकादमीच्या अध्यक्षा मधुरा गडकरी यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन पार पडले. हे प्रदर्शन जनतेसाठी १५ ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहे.
यावेळी उपायुक्त राजेश भगत, क्रीडा अधिकारी डॉ. पियूष अंबुलकर, बालकला अकादमीच्या उपाध्यक्षा सीमाताई फडणवीस आदी मान्यवर उपस्थित होते. येत्या १५ ऑगस्टला ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. या वर्षी ‘हर घर तिरंगा’ या संकल्पनेवर हे अभियान देशभरात राबवले जात आहे. नागपूर महानगरपालिकेचे ‘अमृत महोत्सवी वर्ष आणि केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाअंतर्गत या प्रदर्शनीचे आयोजित केले आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांनी रांगोळी आणि तिरंगा प्रदर्शनीची पाहणी केली.
या ध्वज प्रदर्शनीमध्ये राष्ट्रीय ध्वजाचा इतिहास दर्शविला आहे. त्याचबरोबर, राष्ट्रध्वजाचे मूळ डिझाईन तयार करणारे पिंगली वेंकय्या यांची माहिती या प्रदर्शनात दिली आहे. याशिवाय डाक तिकिटांवरील तिरंगा, तिरंग्याचा आतापर्यंतचा प्रवास आणि विविध ठिकाणी तिरंगा फडकवल्याचे छायाचित्र या प्रदर्शनीमध्ये दर्शविण्यात आले आहेत. ‘हर घर तिरंगा २०२५’ या संकल्पानेवर १८ कलावंतांनी आकर्षक आणि सुंदर रांगोळ्या काढल्या असून याचेही प्रदर्शनी नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. नागरिकांसाठी येथे सेल्फी पॉईंटची व्यवस्था करण्यात आली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येत उपक्रमात सहभागी होत उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन मनपाने केले आहे.




