खापा :- जगात अफाट ज्ञान पुस्तकांच्या रूपाने उपलब्ध आहे. नियमित वाचन केल्याने त्याची प्रचिती येते. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानात भर घालायची असेल तर नियमित वाचन फार महत्त्वाचे आहे. कारण वाचन हे ज्ञान समृद्धीचे गमक आहे असे प्रतिपादन प्राचार्य सुधाकर गजभिये यांनी केले.
स्थानिक जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या उपक्रमात बोलताना ते पुढे म्हणाले, वाचनाची आवड प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात फार महत्त्वाची आहे. जगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ई-बुक ची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे जगात उपलब्ध असणारे कुठलेही पुस्तक आज वेगवेगळ्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ते सहज मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. विद्यालयाच्या ग्रंथालय सुद्धा विविध प्रकारचे पुस्तक उपलब्ध असतात त्यांचं वाचन नियमित करणे गरजेचे आहे. वाचनाची रुची एकदा निर्माण झाली की, नियमित अभ्यासाची सवय लागते. त्यामुळे अपेक्षित यश प्राप्त होते. म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या विविध पुस्तकांचे वाचन केले. व वाचलेल्या पुस्तकाविषयीचे मनोगत आपला शब्दातून व्यक्त केले. सहाय्यक शिक्षिका रचना मोहने यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. सहायक शिक्षक राजेंद्र भोंगाडे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून पालक विद्यानंद निर्मोही त्याचप्रमाणे मुक्ता कडू, उमेश चौरे, भारती कुमरे, प्रफुल्ल वडे, मृत्युंजय सिंग, पल्लवी धुवाधप्पार, आनंद मेनकुदळे इत्यादी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, व मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून वाचण्याचा आनंद घेतला.




