-”उबाठा” सर्कसमध्ये ना वाघ, ना सिंह, ना रिंगमास्टर
मुंबई :- ज्यांच्या तंबूमध्ये आणि ज्यांच्या सर्कशीमध्ये सगळेच विदूषक भरलेले आहेत त्यांनी इतरांना गुलाम म्हणणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे. या सर्कशीत ना वाघ आहे ना सिंह आहे. उबाठा गटामध्ये जे 52 पत्ते शिल्लक आहेत त्या 52 च्या 52 पत्त्यामध्ये सर्व जोकर आहेत. विदूषकांचे सरदार असलेले संजय राऊत हे सकाळी उठून विदूषकाप्रमाणे महाराष्ट्राची करमणूक करण्याचं काम करतात , अशी बोचरी टीका भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी केली . भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
विदूषकांचा भरणा असलेली, रिंगमास्टर नसलेली उबाठांची सर्कस महाराष्ट्राच्या मतदारांनी फ्लॉप केली आहे. 29 महापालिकेपैकी जवळपास 25 महापालिकेमध्ये उबाठा गटाला मोठा भोपळा मिळाला आहे, असेही बन म्हणाले.
तो टोला उबाठांनाच
2019 मध्ये उबाठांनी ज्या पद्धतीने भाजपाचा विश्वासघात करत काँग्रेस, शरद पवारांशी आघाडी केली, त्याच्या संदर्भातच राज ठाकरेंनी आपल्याला राजकारणाची शिसारी आली, असे म्हणत उबाठांना टोला लगावला आहे, असेही बन म्हणाले. बन म्हणाले की राज ठाकरे यांच्या लवचिक भूमिकेचे सगळेजण स्वागत करताहेत. राज ठाकरे यांनी मनापासून उद्धव ठाकरे यांची साथ दिली. परंतु राज ठाकरे यांचा केसाने गळा कापण्याचं काम उबाठांनी केलं, संजय राऊतांनी केलं. उबाठांच्या जागा वाढल्या त्या राज ठाकरे यांच्यामुळे परंतु राज ठाकरे यांच्या जागा वाढल्या नाहीत.2017 च्या महापालिका निवडणुकीत एकटे लढले असताना मनसेचे उमेदवार सात ठिकाणी निवडून आले होते. यावेळच्या निवडणुकीत मात्र फक्त सहा ठिकाणी राज ठाकरेंना विजय मिळाला. याचा अर्थ मनसेने उबाठा गटाला मदत केली परंतु उबाठा गटाने राज ठाकरे यांना मदत केली नाही. अशा पद्धतीने केसाने गळा कापणाऱ्यांबरोबर राहायचं का नाही याचा विचार स्वतः राज ठाकरे यांना करावा लागणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं की मी लवचिक भूमिका घेतो आहे. राज ठाकरेंची पुढची लवचिक भूमिका हीच असेल की ते उबाठा गटापासून दूर जातील. भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. या पुढचा निर्णय राज ठाकरेंनी घ्यायचा आहे, असेही बन यांनी नमूद केले.
उबाठाचे कंटाळवाणे भाषण राज ठाकरेंना ऐकायचे नव्हते
ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना धोका दिला ते पाहता राज ठाकरे देखील उद्धव ठाकरेंची साथ सोडून जातील. त्याची सुरुवात कालच्या मेळाव्यामध्ये झाली आहे. राज ठाकरे थोडा वेळ थांबून उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकू शकले असते. परंतु त्यांना माहिती आहे की उद्धव ठाकरेंचे भाषण म्हणजे कॉमेडी सर्कस आहे. मर्द, कोथळा याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये काही नसतं. त्यामुळे रटाळ, कंटाळवाण भाषण ऐकण्यापेक्षा एका वर्षाच्या मुलीच्या वाढदिवसाला जाण राज ठाकरेंना जास्त योग्य वाटलं.




