– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- जनाब संजय राऊत, उद्योगपतींची दलाली कोण करते हे महाराष्ट्राने पाहिले आहे. दलाली आणि गद्दारी करणे हा तुमचा धर्म आहे. व्यापार्यांचा पक्ष म्हणून भाजपाला डिवचण्यापेक्षा तुम्ही मुंबईतील मराठी माणसांचे रक्त प्यायलात आणि त्यांची लूट केली, त्याबद्दल बोला. एका बाजूला अंबानी – अदानींवर टीका करायची तर दुसऱ्या बाजूला रेड कार्पेट टाकून त्यांचे स्वागत करत लग्नात नाचणारे तुम्ही. त्यामुळे सर्वात मोठे दलाल कोण असतील तर ते संजय राऊत आणि ठाकरे गट आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष नवनाथ बन यांनी सोमवारी प्रहार केला.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात घालणार हे मुद्दे आता जुने झाले आहेत. मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि राहिला प्रश्न मस्तीचा, तर तुमची मस्ती जिरवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. तुमच्या पार्श्वभागावर मतरूपी लाथा मारून घरी बसवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत केले. महापालिकेच्या निवडणुकीतही तेच केले. मुंबई ही महाराष्ट्रातच राहणार आणि येत्या काळातही महाराष्ट्रातील मराठी माणूस, मुंबईकर तुमच्या पार्श्वभागावर पुन्हा एकदा मतरूपी लाथा घातल्याशिवाय राहणार नाही, असे बन म्हणाले.
अमित शाह यांनी शिवसेना तोडली नसल्याचे स्पष्ट करीत बन म्हणाले, तुम्ही मात्र तुमचा उबाठा गट काँग्रेसच्या चरणी अर्पण करून काँग्रेसच्या स्वाधीन केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी गद्दारी करणे, हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करणे हे काम संजय राऊत आणि उबाठा गटाने केले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम एकनाथजी शिंदे यांनी केले आहे. एकनाथजी शिंदे यांची शिवसेना हीच मूळ शिवसेना आहे. आपल्या मूळ विचारांशी ते एकनिष्ठ राहिलेले आहेत आणि त्यांनाच ओमराजे निंबाळकर यांच्यासह इतर खासदारांनी पाठिंबा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम करत आहेत.
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महायुतीचे नेते एकत्र बसून चर्चा करतील. नाशिकमध्ये निश्चितपणे महायुतीला फटका बसला आहे आणि त्या संदर्भात योग्य तो निर्णय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार एकत्र बसून घेतील. ही बंडखोरी का झाली, कोणी समर्थन केले, याची निश्चितपणे चौकशी केली जाईल. यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आणि त्यानंतर या संदर्भातील निर्णय घेतला जाईल. मात्र या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पूर्ण खेळखंडोबा होत तिच्या पार ठिकऱ्या उडाल्या ते पहा. 17 पैकी एकही जागा तुम्हाला जिंकता आली नाही. त्याचा विचार जास्त करा, असे बन यांनी फटकारले.
संजय राऊतांनी उबाठा गट संपवण्याची सुपारी काँग्रेसकडून घेतली
संजय राऊतांनी उबाठा गटाला संपवण्याची सुपारी काँग्रेसकडून घेतली आहे. देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथजी शिंदे हे एकत्र आहेत आणि एकमताने, एकदिलाने काम करत आहेत. उलट तुमच्या मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यात जे युद्ध सुरू आहे, त्याकडे पहा. रोज उठून मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव एकमेकांना शिव्याशाप देत आहेत. तुम्हालाही शिव्याशाप देत आहेत. तुमच्या पक्षात, उबाठा गटात आणि उरल्यासुरल्या गटांमध्ये किती गटबाजी झाली आहे, त्याकडे लक्ष द्या, असे बन यांनी सुनावले.




