spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गॅस संकटाच्या नावाखाली संजय राऊतांचे घबराट निर्माण करण्याचे हीन राजकारण

– भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार

मुंबई :- इराण इस्राईल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित असल्याचे पाहवत नसल्याने संजय राऊत,उबाठा गट, काँग्रेस हे गॅस व इंधन संकटाचा बागुलबुवा उभा करून त्याच्या नावाखाली सामान्य जनतेमध्ये घबराट निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण खेळत असल्याचा प्रहार भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशात 50 लाख गॅस सिलेंडर रोज पुरवले जात आहेत, होर्मुझ सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची आयात सुरळीत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात आहेत. इंधन आयातीसाठी पर्यायी मार्गांचा अवलंब, इतर देशांकडून कच्च्या तेलाची आयात वाढ करणे यासारख्या उपाययोजना करून केंद्र सरकार युद्धपातळीवर कामाला लागले असताना राऊत आणि काँग्रेस गॅस टंचाईच्या नावाखाली जनतेच्या मनात भीती निर्माण करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी बन म्हणाले की, राज्यात गॅस टंचाई नाही, नागरिकांना बुकिंग केल्यावर दोन दिवसांत घरगुती गॅस सिलेंडर मिळत असल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जनतेत घबराट निर्माण करण्यासाठी 2012 साली काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्यांचे फोटो व्हायरल करण्याची नामुष्की उबाठा गट आणि काँग्रेसवर ओढवली असल्याचा घणाघातही त्यांनी केला. सर्व नागरिकांना गॅस पुरवठा करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे आणि त्या जबाबदारीचे भान सरकारला असून ही जबाबदारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत निभावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार करत आहे.

संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताकडे वाकड्या नजरेने बघायची कुणाची हिंमत होत नाही मात्र दुर्दैवानं संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात अशी टीका बन यांनी केली. इराण आणि इस्राईल युद्धाचा फटका आपल्या देशाला बसायला हवा अशी राऊतांची इच्छा आहे. गॅस, इंधन, उर्जा संकटाच्या नावाखाली देशात अराजक पसरण्याचा घाणेरडा घाट राऊतांनी घातला आहे. परंतु राऊतांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही कारण देशातील 140 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.