हंसराज, भंडारा :- जिल्ह्यात सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास, उष्माघाताचा धोका आणि इतर आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन ही उपाययोजना करण्यात आली आहे.
यानुसार, जिल्ह्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी तसेच सीबीएससी व इतर सर्व माध्यमांच्या (मराठी, इंग्रजी इ.) शाळांना हा आदेश लागू असून, त्या शाळांनी सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेतच वर्ग भरवावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी पिणे, उन्हापासून संरक्षण करणे, टोपी/रुमाल वापरणे याबाबत मार्गदर्शन करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
सदर आदेश पुढील सूचना मिळेपर्यंत लागू राहणार असून, सर्व संबंधितांनी त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.