खापा :- शब-ए-बरात’ या पवित्र रात्रीच्या औचित्यावर मुस्लीम बांधवांनी मंगळवारी (दि.३) आपल्या पूर्वजांचे स्मरण करत कब्रस्तानांमध्ये मृत नातेवाइकांच्या कबरींवर पुष्प अर्पण करत फातिहा पठण केले. मशिदींमध्येही सामूहिक नमाज पठणासाठी गर्दी होती. मशिदींमध्ये देशाच्या प्रगतीसह अखंडता टिकून रहावी यासाठी खास दुआ पठण करण्यात आली. इस्लामी कालगणनेत सलग तीन रात्री एकापाठोपाठ येतात. शब-ए-मेराजनंतर, शब-ए-बरात ही दुसरी रात्र साजरी केली जाते. तर रमजान महिन्यात शब ए कदर ही तिसरी रात्र साजरी केली जाते.
आगामी वर्षात भरपूर रोजगारप्राप्ती, संभाव्य संकटे नाहीसे होण्यासाठी व दीर्घायुष्य मिळवून देण्यासाठी खास इबादतची पवित्र रात्र म्हणून ओळखली जाणारी शब-ए-बरात मंगळवार रात्री पारंपरिक पध्दतीने उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त इबादतीसाठी मशिदीत मुस्लिम बांधवांची गर्दी झाली होती.
सायंकाळी मगरीबच्या फर्ज नमाज पठाणानंतर शब-ए-बरातच्या विशेष इबादतला प्रारंभ झाले. अबालवृध्द इबादतमध्ये सहभागी झाले. सायंकाळी यानिमित्त आरफाचा सण मुस्लिमांच्या घरोघरी साजरा झाला. विशेष फातेहा ख्वानीने पूर्वजांचे स्मरण होऊन अल्लाहने या मृतांची मगफीरत करून त्यांना स्वर्गात स्थान द्यावे, यासाठी खास दुवा पठणही झाले. पारंपरिक पध्दतीने साजरी होणारी शब-ए- बरातच्या या पुण्यप्राप्तीच्या रात्री खास इबादतीसाठी (प्रार्थना) मुस्लिम बांधवांत अपूर्व उत्साह दिसून आला. मशिदीत विविध धार्मिक कार्यक्रमांसह नफील नमाज पठण तर कब्रस्तानमध्ये मगफीरतची खास दुवा पठण झाले. शब-ए-मेअराज व शब-ए-बरात झाल्याने आता उपवासाचा महिना पवित्र रमजानुल मुबारकचे वेध लागले आहेत. येत्या एकोनविन फेब्रुवारीपासून रमजान महिन्यास सुरुवात होणार आहे.
दरम्यान, शब-ए-बरात निमित्त रात्री उशिरापर्यंत शहरातील खापा मशिदींत विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. यानिमित्ताने शहरातील मशिद, दरगाह शरीफ, घरे व दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शब-ए-बरातच्या विशेष प्रार्थनेच्या प्रसंगी शहरासह देशावरील विविध संकटे नाहीशी होऊन देशाने प्रगती साधावी, यासाठी खास दुवापठणही झाले. खापा मशिदचे मौलाना मकसूद आलम यांनी धार्मिक प्रवचनातून शब-ए-बरातचे धार्मिक महत्व विशद केले.
शब-ए-बरातच्या सणानिमित्त मौलाना मकसूद आलम यांनी संदेश देताना म्हटले की, शब-ए-बरातनिमित्त होणाऱ्या इबादतचा एक-एक क्षण महत्वाचा असून, अधिकाधिक प्रार्थना करून एकमेकांना क्षमा करुन आपसातील तंटे मिटवावेत. एकमेकांना माफ करणे व अल्लाहकडे क्षमायाचना करणे हा शब-ए-बरातचा मुख्य संदेश असल्याचे धार्मिक प्रवचनातून मौलाना मकसूद आलम यांनी सांगितले. शब-ए-बरात निमित्तच्या विशेष इबादतमध्ये आगामी वर्षात भरपूर रोजगार, दीर्घायुष्य, संकटे टळून अल्लाहताअलाचे सरंक्षण प्राप्तीसाठी सायंकाळी मगरीबच्या फर्ज नमाज पठाणानंतर सहा रकाअत विशेष नमाज पठण झाले.
मगळवारी सायंकाळपासून खापा, बडेगाव , वाकोडी परिसरात शब-ए-बरातची लगबग पहावयास मिळत होती. खापा मशिदीत विशेष दुआ करण्यात आली. खापा येथील हजरत सैय्यद बाबा लष्कर शाह शहीद दर्ग्यांवर भाविकांनी प्रार्थनेसाठी गर्दी केली होती.




