– ट्रायबल फोरमचे मुख्यमंत्र्यांना साकडे
राज्यात गेल्या पंधरा दिवसापासून आदिवासी विद्यार्थी, आदिवासी बेरोजगार उमेदवारांनी विविध ठिकाणी आंदोलन सुरु केले आहे.मात्र अद्यापही शासनाकडून विद्यार्थ्यांचे, बेरोजगार उमेदवारांचे प्रश्न सोडविल्या गेले नाहीत.यावर सहानुभूतीने यशस्वी तोडगा निघालेला नाहीत.त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना ट्रायबल फोरम या संघटनेने निवेदन पाठवून समस्या सोडविण्यासाठी साकडे घातले आहे.
गडचिरोली जिल्हयातील धानोरा तालुक्यामधील जपतलाई अनुदानित आश्रमशाळेतील ३ विद्यार्थीनी सर्पदंशाने म्रुत्यूमुखी पडल्या आहे.त्यापाठोपाठ अमरावती येथील महर्षी पब्लिक शाळेतील विद्यार्थ्याचा म्रुत्यू झाला आहे.पालघर तालुक्यातील मासवण अनुदानितआश्रमशाळेत २ विद्यार्थ्यांचा म्रुत्यू झाला.त्यांच्या पालकांना प्रत्येकी १ कोटी रुपये देण्यात यावे.जपतलाई येथील उपचार घेत असलेल्या ३ बाधित विद्यार्थीनींना ५ लक्ष रुपये देण्यात यावे.अशी मागणी करण्यात आली आहे.
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील बालम्रुत्यू रोखण्यासाठी मा.उच्च न्यायालय मुंबई यांचे १८ जून २०१४ चे निर्देश,डॉ.सुभाष साळुंखे यांच्या समितीने १९ आक्टोबर २०१६ रोजी सुचविलेल्या शिफारशी, आश्रमशाळा संहिता यांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे जपतलाई प्रकरणासह अमरावती, पालघर येथील दोषी असणा-या संबंधितांना, अधिका-यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे.
राज्यात ५५६ अनुदानित, ४९७ शासकीय आश्रमशाळा आहे.बहुतांश ठिकाणी विद्यार्थ्यांना झोपायला बेड नाहीत.पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. सर्पदंश रोखण्यासाठी स्वच्छता, खिडक्यांना दारे नाही, एएसव्ही ( Anti -Snake Venom ) इंजेक्शन उपलब्ध नाहीत.अशा अनुदानित आश्रम शाळांची मान्यता रद्द करण्यात यावी.
शासकीय वसतीग्रुहातील विद्यार्थ्यांसाठी डीबीटी प्रणाली बंद करुन सरकारी यंत्रणेद्वारे खाणावळ सुरु करण्यात यावी.
आश्रमशाळांत अन्न पुरवठा करणारी सेंट्रल किचन पद्धत बंद करुन पूर्वीचीच भोजन व्यवस्था पूर्ववत करण्यात यावी.अशी मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.
*बिंदू दुरुस्ती, पदभरतीचीही मागणी
आदिवासी बेरोजगार उमेदवारांनीही आंदोलन सुरु केल्यामुळे छोटा संवर्ग बिंदूनामावलीतील अनुसूचित जमातीचा बिंदू २ क्रमांकावर पूर्ववत करण्यात यावा. आदिवासींच्या १२ हजार ५०० पदांची विशेष पदभरती करण्यात यावी.पेसा क्षेत्रातील १७ संवर्गाची अनुसूचित जमातीची पदे तात्काळ भरण्यात यावी.अशीही मागणी ट्रायबल फोरम नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.





