यवतमाळ, दि. २४ : आरोग्य विभागामार्फत २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२५ या कालावधीत मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र ही विशेष मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरीकांना मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू नेत्र सस्त्रक्रिया उपलब्ध करुन देण्यात येत आहे. राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री व कुटंब कल्याण विभाग, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, महिला व बाल विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.
जिल्ह्यामध्ये सदर मोहीमेचे उद्घाटन २२ जूलै २०२५ रोजी यवतमाळ विधान सभा मतदार संघाचे नामदार बाळासाहेब मागूळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. प्रशांत चव्हाण, नेत्रतज्ञ डॉ. स्मिता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व रुग्णांना मोतिबिंदू आजाराविषयी तसेच डोळयांच्या इतर आजाराविषयी माहिती देण्यात आली. मोतिबिंदू मुक्त महाराष्ट्र योजना यशस्वी करण्यासाठी ४० वर्षावरील सर्व जनतेची नेत्रतपासणी तसेच ज्यांना डोळ्यांचे इतर आजार आहेत, अशा सर्वांनी आपले नेत्र तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच महिला व बाल रुग्णालय यवतमाळ येथील नेत्र विभाग येथे जावून करुन घ्यावी. असे आव्हाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांनी केले आहे.
मेतिबिंदू एक सामान्य पण दुर्लक्षित होणारा आजार
मेतिबिंदू हा डोळयांतील लेन्स (भिंग) अस्पष्ट होण्याचा एक आजार आहे. ज्यामुळे दृष्टी मंद होते, धुसर दिसते किंवा संध्याकाळी स्पष्ट दिसत नाही. हा आजार विशेषतः हा वृध्द वयात अधिक आढळतो. पण काही वेळेस डोळयाला इजा झाल्यास, मधुमेह दिर्घकाळ औषधोपचार किंवा अनुवंशिक आजारामुळे सुध्दा होऊ शकतो.
मोतिबिंदूची लक्षणे
अस्पष्ट किंवा धुसर दृष्टी, रात्री दिसण्यास अडचण, चष्म्याच्या नंबर मध्ये वारंवार बदल होणे, रंगाची स्पष्टता कमी होणे, डोळयांच्या बाहूलीचा रंग करा/पांढरा होणे,मोतिबिंदूवर कोणतेही औषध किंवा चष्मा कायमचा उपाय नाही. मोतिबिंदूचे एकमेव व प्रभावी उपचार म्हणजे शस्त्रक्रिया करणे.आजकाल आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शास्त्रक्रिया अतिशय सुरक्षीत,वेदना रहीत आणि काही मिनिटात होणारी आहे. रुग्णांला दुसऱ्या दिवशी घरी जाण्याची मुभा दिली जाते.
मोतिबिंदू वर वेळेवर उपचार न केल्यास दृष्टी पूर्णपणे हरवू शकते. मात्र योग्यवेळी शस्त्रक्रिया केल्यास ती दृष्टी परत येवू शकते. आपल्याला किंवा आपल्या घरातील कोणालाही वरील लक्षणे जाणवत असतील तर विलंब न करता जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्या. अशी माहीती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुखदेव राठोड तसेच जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार यांनी दिली आहे.




