– मतदानाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे –गटनेता काशीनाथ प्रधान
कामठी :- भारत निवडणूक आयोगाच्या वतीने कामठी शहरात राबविण्यात येत असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) अर्थात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण मोहिमेला प्रारंभ झाला असून, या मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने सक्रिय सहभाग नोंदवून आपली माहिती अचूकपणे भरावी, असे आवाहन कामठी नगर परिषद चे गटनेता व प्रभाग क्र 11 चे नगरसेवक काशिनाथ प्रधान यांनी केले आहे.
मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (BLO) घराघरांत जाऊन मतदारांची माहिती संकलित करत असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह पूर्ण सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
अर्ज भरताना दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यक माहिती आणि स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा अनिवार्य आहे. ४० वर्षांवरील मतदारांनी २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचा किंवा कुटुंबातील सदस्यांचा अनुक्रमांक उपलब्ध ठेवावा. विवाहित महिलांनी माहेरच्या कुटुंबाची २००२ मधील मतदार यादीतील माहिती तपासून ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
गटनेता काशीनाथ प्रधान यांनी स्पष्ट केले की, निर्धारित कालावधीत अर्ज सादर न केल्यास संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे मतदानाच्या घटनात्मक अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी नागरिकांनी वेळेत माहिती भरून सहकार्य करणे आवश्यक आहे.
“आपला मतदार – आपला अधिकार, आपली जबाबदारी” या संदेशाचा स्वीकार करून प्रत्येक पात्र नागरिकाने या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.




