पांढरकवडा :- जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्यावर झालेल्या अमानुष हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक व संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद पांढरकवडा तालुक्यात उमटले असून, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी संघटना (तालुका शाखा पांढरकवडा) यांच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
कर्तव्यावर असताना अशा प्रकारे अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू होणे ही अत्यंत गंभीर आणि वेदनादायी बाब आहे. राज्य संघटनेच्या धोरणानुसार व यवतमाळ जिल्हा शाखेच्या निर्देशानुसार पांढरकवडा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी १८ ऑगस्ट २०२६ पासून आयोजित होणाऱ्या सर्व ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी, पंचायत समिती पांढरकवडा यांना सादर करण्यात आले आहे. या आंदोलनाची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांनाही देण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
शासनाने दोषींवर कडक कारवाई करावी:
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत अधिकारी संघटना, पांढरकवडा यांच्या वतीने अध्यक्ष व सचिवांनी निवेदनाद्वारे केली आहे.





