– विद्यापीठातील प्राचार्यांच्या सभेत सर्व विद्यार्थिनींची नोंदणी करण्याचे केले आवाहन
नागपूर :- महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने शासनाने सुरू केलेले स्वयंसिद्धा अभियान भारताला सुपर पॉवर बनवेल, असे प्रतिपादन राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या गुरुनानक भवन येथे संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्यांची सभा शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी पार पडली. या सभेत डॉ. नारनवरे मार्गदर्शन करीत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी भूषविले, प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल कार्यालयाचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, राज्यपाल परिवाराचे प्रबंधक निशिकांत देशपांडे, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, कार्यस्थळी लैंगिक शोषण व अत्याचार विरोधी संरक्षण समितीच्या अध्यक्ष डॉ. शालिनी लिहितकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिशन आदीशक्ती सुरू केले आहे. शासनाने याबाबत आदेश निर्गमित केले असून विद्यापीठ तसेच संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थिनींची स्वयंसिद्धा पोर्टलवर नोंदणी करण्याचा राज्यपाल महोदयांचा संदेश घेऊन आलो असल्याचे डॉ. नारनवरे यांनी पुढे बोलताना सांगितले. राज्यातील सर्व विद्यापीठांचे समन्वय व्हावे याकरिता मुंबई येथील एसएनडीटी येथे केंद्र सुरू केले आहे. स्वयंसिद्ध अभियानाच्या यशस्वीतेसाठी राज्य, विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर अशी त्रिस्तरीय समिती राहणार आहे. सद्यस्थितीत स्त्रीशक्ती पोर्टलवर ७ लाख महिलांनी नोंदणी केली आहे.
या माध्यमातून महिला स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करण्यास उपयोग घेत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने निर्माण केलेल्या स्वयंसिद्ध पोर्टलवर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयाने प्रोफाइल तयार करायचे आहे. या पोर्टलवर विद्यापीठ तसेच संलग्नित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीची नोंदणी करावयाची आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण विद्यार्थिनींची या पोर्टलवर नोंदणी झाल्यास स्वयंसिद्धाचे मोठे नेटवर्क निर्माण होईल. यातून नोंदणीकृत प्रत्येक महिलेला आपला स्वयंरोजगार, उत्पादित केलेल्या वस्तू तसेच कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक माहिती, शिष्यवृत्ती, प्रवेश,रोजगार त्याचप्रमाणे देशातील नामांकित उच्च शिक्षण संस्थांमधील प्रवेशाबाबत संपूर्ण माहिती या पोर्टलवर उपलब्ध राहणार आहे.

जगामध्ये भारत हा तरुणांचा देश म्हणून उदयास येत असून जगाच्या विविध देशांमध्ये येथील तरुणांची मागणी वाढणार आहे. त्या अनुषंगाने संबंधित विषयांमध्ये कौशल्य निर्माण करीत आपण बाहेर जाण्यास तयार असायला हवे. इटली सोबतच जपानमध्ये देखील कुशल मनुष्यबळाची मागणी होत असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. या सोबतच विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाने स्थानिक उद्योगांना अपेक्षित असलेले कौशल्य प्राप्त मनुष्यबळ निर्माण करण्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इंटर्नशिपच्या माध्यमातून प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे उद्योगांच्या समन्वयातून कौशल्य वृद्धगीत करावे असे डॉ. नारनवरे म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन अधिष्ठाता डॉ. मेधा कानिटकर यांनी केले.




