– ‘हरित महाराष्ट्र आयोग’ अंतर्गत पाटबंधारे उपविभागाचा स्तुत्य उपक्रम : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
पंकज परशुरामकर प्रतिनिधी
नवेगावबांध :- पर्यावरण संवर्धन आणि निसर्गाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘हरित महाराष्ट्र आयोग’ अंतर्गत लोकसहभागातून 10 हजार वृक्षलागवड अभियानाचा श्रीगणेशा आज नवेगावबांध येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाला. पाटबंधारे उपविभाग, नवेगावबांध यांच्या वतीने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वृक्षलागवड समिती, नवेगावबांधचे अध्यक्ष महादेव बोरकर हे होते. निसर्गाचे रक्षण ही काळाची गरज असून प्रत्येकाने झाडे लावून ती जगवली पाहिजेत, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वृक्षलागवड समितीचे सचिव जगदीश पवार, सेवानिवृत्त वन परिक्षेत्र अधिकारी अशोक खुणे, पाणी वापर संस्था नवेगावबांधचे अण्णा पाटील डोंगरवार, पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी समीर बनसोडे, सहाय्यक अभियंता (श्रेणी-२) संकल्प मेश्राम, वरिष्ठ लिपीक श्रीकांत मस्के आणि स्था.अ.स. किसन अग्रवाल हे उपस्थित होते. पर्यावरण संतुलनासाठी “एक व्यक्ती – एक वृक्ष” हा संकल्प स्वीकारून प्रत्येकाने वृक्षारोपणात आणि त्यांच्या संगोपणात स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले. ग्रामस्थ व अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग वृक्षलागवडीच्या या अभियानात पाटबंधारे उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये सुनील सोयाम, संदीप बोळणकर, रोशन कावळे, श्रीकृष्ण बुराडे, कपिल परचाके, हिरेश रुकमोडे, अक्षय अंभोरे, प्रणाली मेश्राम, दीक्षा शहारे, प्रेमचंद अग्रवाल, चंद्रभान टेंभुर्णे, अंकित शहारे, तुषार बडोले यांच्यासह अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष वृक्षलागवड करून ‘हरित नवेगावबांध… हरित महाराष्ट्र’ या चळवळीला भक्कम पाठबळ दिले.





