spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा 36 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

नागपूर :- येथे राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा (ओबीसीची सत्यशोधक वाटचाल) चा 36 वा वर्धापनदिन विविध सामाजिक आणि वैचारिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यसंयोजक नितीन चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामाजिक न्यायाचे उद्गाते महात्मा फुले यांच्या 200 व्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त आणि संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंती पर्वाच्या प्रेरणेने ‘ओबीसीची सत्यशोधक वाटचाल’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्री गुरु देव सेवा श्रम, नागपूर येथे झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वेबसाईटचे विमोचन करण्यात आले. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. ‘सत्यशोधक’ चित्रपट निर्माते सुनिल शेळके आणि पथनाट्यकार, चित्रपटकार संजय जीवने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या सोबतच अर्चना देशमुख, काटोल नगराध्यक्ष, अविनाश ठाकरे, माजी मनपा स्थाई समिती अध्यक्ष, अड. भुपेश पाटील, प्राचार्य असलम बारी यांचा विशेष ओबीसी सहयोगी म्हणून आणि सोबतच अड. अशोक यावले, जेष्ठ समाजसेवक हरिकिशन हटवार, पत्रकार अरुण आसटकर, असलम खातमी, तुषार पेंढारकर यांचाही ओबीसी साथी म्हणून सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शिंभोणे यांनी, महात्मा फुले यांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना, प्रतिगामी शक्तींविरोधात हा विचार पुढील अनेक वर्षे मार्गदर्शक ठरेल, असे मत व्यक्त केले. बहुजनांच्या सामाजिक आणि आर्थिक मुक्तीसाठी महात्मा फुले यांचे विचार महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माजीमंत्री सुनील केदार यांनी राज्याच्या पुरोगामी विचारसरणीसमोर मोठे आव्हान उभे असल्याचे सांगितले. सरकार शिक्षण, आरोग्य, शेतकरी आणि बेरोजगारीच्या प्रश्नांपेक्षा धार्मिक कार्यक्रमांवर अधिक लक्ष केंद्रित करत असल्याची टीका त्यांनी केली. ओबीसी आणि कष्टकरी समाजाने न्यायासाठी संघटित संघर्ष करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीचे विचारवंत अशोक भारती यांनी मागासवर्गीय समाजाने एकत्र येऊन सामाजिक न्यायासाठी संघर्ष अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली.कार्यक्रमात अतिथी म्हणून महिला सत्यशोधक कार्यकर्ता नुतन माळवी यांनी ओबीसीने अधिकारासाठी पुढे यावे आणि दैववादाच्या प्रकाराला बळी पडू नये असे आवाहन केले. यावेळी ओबीसी प्रतिनिधित्व, आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विविध मुद्द्यांवर काही महत्त्वपूर्ण संकल्प मांडण्यात आले. संचालन अँड.अशोक यावले यांनी तर आभार तुषार पेंढारकर यांनी मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.