भंडारा :- देशातील अत्यंत महत्त्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या भारताची जनगणना २०२७ प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्यात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. जनगणना अधिनियम १९४८ अंतर्गत होणारी ही जनगणना यंदा प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे.
जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे घर नोंदणी व गृहनिर्माण जनगणना (HLO) हा १६ मे ते १५ जून २०२६ दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याआधी स्वयं-गणना ) टप्पा १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. नागरिकांसाठी विशेष मोबाईल अॅप “Census 2027-HLO” तसेच स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील जनगणना विषयक कामासाठी जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी विविध घटकांशी संवाद साधला. जनगणनेच्या कामांमध्ये सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा , प्रत्येक गावातील शहरातील नागरिकांची जनगणना झाली पाहिजे यासाठी त्यांनी आवाहन केले. आज सकाळी जिल्हा परिषदेचे सदस्य, नगर परिषदेचे सदस्य यांच्यासह अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि बचत गटांच्या महिला सदस्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
जनगणना करताना या सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा तसेच माहिती अचूक भरावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

