गडचिरोली :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला संलग्न कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे विकसीत भारत जी राम जी योजनेचा प्रसार व प्रसिध्दी करण्याच्या अनुषंगाने दिनांक ३ व ४ जानेवारी २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. यादरम्यान दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सरपंच सम्मेलनाचे आयोजन करण्यात आलेले होते. ज्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी उत्पादक कंपण्यांचे पदाधिकारी यांना आमंत्रित करण्यात आलेले होते. तसेव दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी मौजा वाकळी, हिरापूर, कृपाळा, गुरवळा, मुडझा व कनेरी इ. गावांमध्ये सदर योजनेसंबधीत माहीती फलक व पॉम्प्लेट वितरीत करून गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ज्योती कडू, महिला व बालविकास अधिकारी, गडचिरोली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, विकसीत जी राम जी योजना ही केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना असून आता या योजनेअंतर्गत मजुरांना एका वर्षात १०० ऐवजी १२५ दिवसांची रोजगाराची हमी मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत गाव पातळीवर प्रलंबीत कामे मार्गी लागणार असून सर्वसामान्यांना याचा थेट लाभ होणार आहे असे प्रतिपादन केले.
सुचित लाकडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा समजावून सांगतांना सदर योजना ही जुन्या मनरेगा योजनेमध्ये विविध सुधारणा करून नविन परिभाषित विकसीत भारत जी राम जी योजना म्हणून कार्यान्वीत करण्यात आलेली असून केंद्र शासनाच्या सुचनांनुसार या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.
निलिमा पाटील, विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान) यांनी गावांचा सर्वांगिण विकास साधण्याकरीता येणाऱ्या ग्रामसभांमध्ये गावकऱ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेऊन या योजनेअंतर्गत जास्तीत-जास्त कामे गावाकरीता कशी करता येतील यावर भर द्यावा असे सांगितले.
गणेश गणवीर, प्रभारी अधिकारी, कृषि संशोधन केंद्र, गडचिरोली यांनी उपस्थितांना फळे व भाजीपाला लागवडी विषयी सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. प्रितम चिरडे, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) यांनी नैसर्गीक शेती विषययी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता दिपक चव्हाण, सहाय्यक, सुनिता थोटे, प्रक्षेत्र व्यवस्थापक, मोहीतकुमार गणविर, कृषि हवामान निरीक्षक, शशिकांत सलामे, अंकुश ठाकरे तसेच बायफ, गडचिरोलीचे पदाधिकारी, कोईतुर शेतकरी उत्पादक कंपणीचे अधिकारी व पदाधिकारी आणि शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित होते.




