कुप्रथा आणि रोगराई दूर करण्यासाठी तान्ह्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य मारबत मिरवणूक
सचिन चौरसिया, रामटेक २५ : ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या शेकडो वर्ष जुन्या मारबत महोत्सवाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली. तान्ह्या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी शहरात समाजातील कुप्रथा, रोगराई आणि संकट दूर करण्याच्या उद्देशाने भव्य मारबत मिरवणूक काढण्यात आली.
या दिवशी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मारबतिचे पूजन करून मिरवणुकीचा प्रारंभ केला. विविध समाजघटक, सांस्कृतिक संस्था, मंडळे आणि नागरिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले.
तान्ह्या पोळ्याच्या दिवशी पारंपरिकरित्या ‘मारबत आणि बडग्या’ अशा दोन प्रकारच्या मिरवणुका काढल्या जातात. ढोल, ताशे, नगारे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात नागपूर शहरात सजवलेल्या रथांवरील कलात्मक मारबत फिरवण्यात आली. नागरिकांनी “इडा-पीडा, रोगराई, खासी-खोकला घेऊन जा गे.. मारबत” अशा घोषणांनी वातावरण दणाणून टाकले.
मारबत महोत्सव हा नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. शतकांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा वाईट कुप्रथा, सामाजिक विषमता, रोगराई आणि संकटे दूर करण्याचे प्रतीक मानली जाते. आजही श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संगम म्हणून हा उत्सव नागपूरकरांच्या उत्साहात आणि एकोप्याने साजरा केला जातो.




