किशोर साहू, मौदा ,ता. २६ :- नुकतेच केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अधिनियम 2025 मंजूर केले आहे. या अधिनियमातील प्रमुख तरतुदी व कायदेशीर हक्क यांची व्यापक जनजागृती करण्यासाठी आज शुक्रवार (दि. 26 डिसेंबर)ला महाराष्ट्रातील सर्वच ग्राम पंचायत मध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायतच्या प्रत्येक सरपंचांना पत्र पाठवून केले आहे.
या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थ, मजूर ,अनुसूचित जाती, जमातीतील कुटुंबे, शेतकरी महिला बचत गट, शेतकरी, उत्पादक संस्था यांच्या रोजगार या उपजीविकेशी संबंधित नवीन तरतुदी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी चर्चा होऊन ठराव घेण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतीने काढलेले विशेष ग्रामसभेचे दवंडीचे पत्र आज गुरुवार (दि. 25 डिसेंबर)ला सोशल मीडियावर स्टेटस च्या माध्यमातून व गावागावात प्रत्यक्ष दवंडी देऊनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानाला प्रतिसाद देण्यात येत आहे.




