यासीन शेख, गोंदिया सडक अर्जुनी :- होळी रंगपंचमीच्या दिवशी गावातील तलावात बुडालेल्या सागर (वय १६) व प्रणय (वय १२) या दोन मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिकांच्या आरोपानुसार, वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध झाला असता तर किमान एका मुलाचा जीव वाचू शकला असता.
घटनेनंतर मुलांना तातडीने सौंदड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले; मात्र तेथे ऑक्सिजन व तातडीची रुग्णवाहिका नसल्याचे सांगण्यात आले. अखेर सडक अर्जुनी येथील खाजगी रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर मागवून भंडारा येथे हलविताना वाटेतच एका मुलाचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ऑक्सिजन नाही, ॲम्बुलन्स नाही; सागर-प्रणयच्या मृत्यूने उघड केली आरोग्य व्यवस्थेची पोलखोल
होळीच्या आनंदात क्षणात शोककळा पसरवणाऱ्या या घटनेत सागर व प्रणय या अल्पवयीन मुलांना योग्य व वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. ग्रामीण रुग्णालयात ना प्रशिक्षित डॉक्टरांची उपलब्धता, ना जीवनावश्यक साधनसामग्री —अशा स्थितीत रुग्णांना बाहेर हलवण्यावाचून पर्याय उरत नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
वेळेत ऑक्सिजन मिळाला असता तर परिस्थिती वेगळी असती, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर संतप्त जनतेचा रोष; पोलिस बंदोबस्तात टळली तोडफोड
सागर व प्रणयच्या मृत्यूच्या बातमीने फुटाळा व सौंदड परिसरात तीव्र संताप उसळला. ग्रामीण रुग्णालयातील निष्काळजीपणाविरोधात नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन तोडफोडीची शक्यता निर्माण झाली होती.
मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वातावरण तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.
खाजगी रुग्णालयातून ऑक्सिजन आणण्याची वेळ; जीव वाचविण्याची शर्यत ठरली निष्फळ
घटनेनंतर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने सडक अर्जुनी येथील खाजगी रुग्णालयातून सिलेंडर आणावा लागला. उपचारांसाठी भंडारा येथे हलविताना वाटेतच एका मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
जीवनावश्यक सुविधा असलेल्या ग्रामीण रुग्णालयातच जर अशा कमतरता असतील, तर ग्रामीण भागातील रुग्णांनी विश्वास कुणावर ठेवायचा? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
होळीचा आनंद शोकांतिका ठरला; सागर-प्रणयच्या मृत्यूने प्रशासनाला जाग येणार का?
रंगपंचमीच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. दोन निष्पाप मुलांचे बळी गेल्यानंतरही ग्रामीण रुग्णालयातील व्यवस्थेबाबत ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिकांनी तात्काळ चौकशी, जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन, डॉक्टर व ॲम्बुलन्सची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.




