नागपूर, दि. २९ – जिल्ह्यात वृक्ष लागवडीच्या मोहीमेकडे केवळ शासकीय उपक्रम न पाहता प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची भावना मनात ठेवून आपल्याला दिलेल्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले पाहिजे. जिल्ह्यात विविध विभागांतर्गत ज्या-ज्या ठिकाणी शासकीय जमिनी व कार्यालय आहे अशा सूमारे एक हजारापेक्षा अधिक ठिकाणी मियावाकी पध्दतीने वृक्ष लागवड करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज वृक्ष लागवड मोहीमेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, नागपूर वन विभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास व संबंधित सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यासाठी आपण सूमारे एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. जिल्ह्यातील महामार्गाच्या बाजूला, टोल नाक्याच्या परिसरात व याचबरोबर जिल्हा परिषदेसह नगर विकास विभाग व इतर सर्व विभागप्रमुखांनी आपल्या कार्यालय परिसरात कल्पक पध्दतीने वृक्ष लागवडीकडे पाहणे आवश्यक आहे. यात नगर पंचायतीने आपल्या कार्यालयाच्या परिसरात भर देण्यासह लोकसहभागाला चालना दिली पाहिजे. हेच उत्तरदायित्व जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या सर्व विभागांनी महसूल विभागाच्या समन्वयातून पूर्ण करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मियावाकी घनवन ही जपानचे वनस्पतीशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांची संकल्पना आहे. स्थानिक प्रजातींद्वारे रोपांची घनदाट लागवड करतात. रोपे निवडताना दुर्मिळ प्रजातींना प्राधान्य असते. ज्या मातीची प्रत प्राधान्याने खराब असते, अशा चार स्तरांमध्ये एक ते बारा महिने वयाची रोपे लावतात. मृदा सर्वेक्षण, प्रजातींची निवड आणि वर्गीकरण, बायोमास सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि देखभाल असे टप्पे मियावाकी पद्धतीत पार पाडावे लागतात.




