– हिरव्या मतांवर मुंबई महापालिका जिंकण्याचा उबाठाचा कुटील डाव
– भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा घणाघात
मुंबई :- किशोरी पेडणेकर यांच्यासह उबाठा गटाचे सर्व नेते हिंदू दुबार मतदारांबद्दल उच्चरवात बोलतात. पण मुस्लीम दुबार मतदारांकडे सोईस्कर दुर्लक्ष करत. त्यांच्याबद्दल ब्र देखील काढत नाहीत. हिंदू दुबार मतदारांना लक्ष्य करून हिरव्या मतांवर मुंबई महापालिका जिंकण्याचा उबाठाचा कुटील डाव आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील मुस्लीम दुबार मतदारांची नावे बूथ क्रमांकासकट पत्रकारांसमोर सादर करीत आदित्य ठाकरे यांचाही विजय हा मुस्लीम दुबार मतदारांच्या बळावर झाला का असा परखड सवालही त्यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बन म्हणाले की, भाजपाची भूमिका ही नेहमीच सर्वांना न्याय, पण कुणाचेही तुष्टीकरण नाही अशी आहे. मात्र उबाठा आणि मविआची भूमिका मुस्लीम तुष्टीकरणाची आहे. आदित्य ठाकरे हे हिंदू दुबार मतदारांवर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देतात. मुस्लीम दुबार मतदारांच्या बळावर वरळीमध्ये जिंकून आलेल्या आदित्य ठाकरेंनी आधी राजीनामा द्यावा आणि मग दुबार मतदारांबद्दल शंका उपस्थित करावी. आदित्य यांनी मनसेचे संदीप देशपांडे यांचा पराभव केला त्यामुळे उबाठा गटाकडून दुबार मुस्लीम मतदारांची नावे घुसवली गेली का याचा तपास मनसेने करावा असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणूक आयोगाने वरळी आणि अनेक भागात मोठ्या प्रमाणात असलेल्या मुस्लीम दुबार मतदारांची नावे कमी करावी अशी मागणीही बन यांनी केली.

आ. निलेश राणे यांनी मालवणमधील भाजपाचे पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या राहत्या घरी घुसखोरी करत किंजवडेकर निवडणुकीसाठी पैसे वाटप करतात असा आरोप केला. हे भाजपा विरोधातील षडयंत्र असल्याची टीका बन यांनी केली. माहितीअंती ते पैसे किंजवडेकर यांच्या बांधकाम व्यवसायातील त्यांचे स्वत:चे पैसे होते. काही शंका असेल तर आ. राणे यांनी रितसर तक्रार आयोगाकडे आणि पोलीसांकडे करायला हवी होती. फेसबुक लाइव्ह करत धाड टाकण्याचा राणे यांना अधिकार नाही. भाजपा पैशाच्या बळावर निवडणूक कधीच लढत नाही. विकास कामामुळे मतदारांचा विश्वास भाजपावर आहे, असे बन यांनी नमूद केले.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रोहित पवार विधानसभेची निवडणूक लढत असताना बारामती ॲग्रोचे कर्मचारी कर्जत जामखेडमध्ये पैसे वाटत होते याची आठवण बन यांनी करून दिली. त्यामुळे शरद पवार यांनी पैसे न वाटण्याचा सल्ला आधी रोहित पवार यांना दिला असता तर बरे झाले असते असा टोमणाही बन यांनी लगावला.
हा सलीम खान कोण हे काँग्रेसने सांगावे
सलीम खान नावाची एकही व्यक्ती 26 नोव्हेंबर 2008 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झाली नसताना मुस्लीम लांगुलचालन करण्यासाठी जाणीवपूर्वक सलीम खान यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्वीटमध्ये घुसवले गेले असा हल्लाबोलही बन यांनी केला. काँग्रेसकडून जाणूबुजून फेक नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. आम्ही हे निदर्शनास आणल्यानंतर काँग्रेसवर ते ट्वीट डीलीट करण्याची नामुष्की ओढवली. ट्वीटमध्ये सलीम खान कुठून आणला? कोण आहे हा? याची उत्तरे हर्षवर्धन सपकाळ यांनी द्यायला हवी असे बन म्हणाले.




