हंसराज,प्रतिनिधी भंडारा अड्याळ :- सहलीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावात बोट चालवताना तोल बिघडल्याने आणि पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रावनवाडी जलाशयात घडली. सौरभ अमरसींग मेहरा (वय २३, रा. उत्तराखंड) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील रहिवासी असलेला सौरभ मेहरा हा आपल्या मित्रांसोबत मौजा रावनवाडी येथील जलाशय परिसरात फिरायला गेला होता. यावेळी तलावाकाठी बांधलेली एक बोट सोडून ते सर्वजण जलाशयात फेरफटका मारण्यासाठी गेले. मात्र, काही अंतर गेल्यावर अचानक बोटीचा संतुलन बिघडले. बोट उलटण्याच्या भीतीने बोटीत बसलेल्या सौरभ आणि त्याच्या सोबत्यांनी पाण्यात उड्या मारल्या.
पाण्यात उड्या मारल्यानंतर त्याचे इतर सोबती पोहत सुखरूप बाहेर पडले. मात्र, सौरभला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात ओढला गेला आणि बेपत्ता झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. सौरभचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह रावनवाडी तलावात मिळून आला.
याप्रकरणी मृतकचा भाऊ राहुलसींग अमरसींग मेहरा (वय २६) याने अड्याळ पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची नोंद कायमी मर्ग क्रमांक ०५/२०२६, कलम १९४ बी.एन.एस.एस. अन्वये केली आहे. पुढील तपास अड्याळ पोलीस करीत आहेत. तरुण मजुरीनिमित्त या भागात आला होता, मात्र या अपघातामुळे त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.




