गोंदिया २७ : राज्यातील वीज दरवाढीच्या निर्णयामुळे विदर्भातील औद्योगिक क्षेत्रात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आधीच मंदावलेल्या बाजारपेठेमुळे त्रस्त असलेल्या उद्योग-व्यवसायांवर वाढीव वीज दरांचा मोठा आर्थिक ताण पडला आहे. लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग (MSME) तसेच मोठे औद्योगिक प्रकल्प उत्पादन खर्च वाढल्याने अडचणीत सापडले असून, अनेक प्रकल्प बंद होण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती उद्योजक व्यक्त करत आहेत.
विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीसह विविध औद्योगिक संघटनांनी राज्य सरकारकडे वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.
चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “विदर्भात वीज उत्पादन मुबलक असूनही स्थानिक उद्योगांना वीजदर वाढीचा फटका बसणे अत्यंत अन्यायकारक आहे. सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल,” असे स्पष्ट करण्यात आले.
FIA विदर्भचे उपाध्यक्ष दिनेश अग्रवाल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र सरकारने आधी आश्वासन दिले होते की वीज दर वाढविले जाणार नाहीत, मात्र आज महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेतच नव्हे, तर दरवर्षी वीज दर सातत्याने वाढत आहेत. या वाढीमुळे उद्योग-धंद्यांवर प्रचंड परिणाम होत असून, उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे. सरकारने तातडीने यावर अंकुश लावावा.”
संघटनांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरच निर्णय घेऊन वीज दरवाढ रद्द करण्यात आली नाही, तर उद्योगपती आणि उद्योजक रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करण्यास भाग पाडले जातील.




