– भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा खोचक सवाल
– उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याला ओवैसी, सज्जाद नोमानींना बोलवावे
मुंबई :- वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार सोडून देत काँग्रेसच्या सोबत सत्तेत जाऊन बसलेल्या उद्धव ठाकरेंच्या राजवटीत हिंदूंवर खुलेआम हल्ले होत होते, दंगे होत होते, हिंदूंची घरे जाळली गेली होती. महायुती सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्याला प्राधान्य दिले जात आहे. दंगेखोरांवर कारवाई केली जात आहे. अहिल्यानगर मध्ये पोलिसांनी दंगेखोरांवर कारवाई केल्याचा संजय राऊतांना एवढा राग का यावा, असा खोचक सवाल भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उबाठा गट काँग्रेसचा आश्रीत झाला असून राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची उबाठा सेना ही उपकंपनी झाली असल्याची बोचरी टीका बन यांनी केली. काँग्रेसची री ओढण्याचे काम सध्या राऊत करत असल्याचेही ते म्हणाले.
उबाठा गटाच्या दसरा मेळाव्याला राहुल गांधी, ओवैसींना, सज्जाद नोमानीला बोलवावे अशी खोचक टिप्पणी करत बन यांनी उबाठा गटाला आव्हान दिले. जय शाह यांच्याऐवजी असउद्दीन ओवैसींनाच मंचावर बोलवा म्हणजे आत्मा शांत होईल अशी कोपरखळीही त्यांनी लगावली.
कोणत्याही निकषात न अडकता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येक शेतक-याला सर्वतोपरी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकालील सरकार झटत आहे. शेतक-यांना दिलासा देताना कागदी घोडे नाचवले जाणार नाहीत याचा महायुती सरकारने निर्धार केला आहे. पीडित बळीराजाच्या खात्यात दिवाळीपूर्वी सरकारकडून भरीव मदत जमा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे, असे बन यांनी नमूद केले.
खा. संजय राऊत यांचा विधिमंडळ विशेष अधिवेशनाचा प्रस्ताव मूर्खपणाचा असून सद्यस्थितीत शेतक-यांना तातडीची मदत देण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. या दिशेने भाजपा महायुती सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत असे बन यांनी नमूद केले. अधिवेशनावर कोट्यवधी उधळण्याऐवजी तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाणे गरजेचे असल्याचेही बन म्हणाले.
अराजक माजविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
प्रदेश काँग्रेसने केलेल्या असंवेदनशील ट्वीट वर टीका करत बन म्हणाले की, ट्वीटच्या माध्यमातून राज्यात अराजक माजवण्याचे कारस्थान रचले जात आहे. यासंदर्भात भाजपा सोशल मीडियाचे संयोजक प्रकाश गाडे यांनी मुंबई पोलिसांमकडे केलेल्या तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र काँग्रेसच्या ट्विटर खात्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. समाजकंटकांना हाताशी धरून देश किंवा महाराष्ट्रामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार असेल तर त्यात काँग्रेसचे तोंड पोळल्याशिवाय रहाणार नाही.




