नागपूर, ०३ – राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात 20 लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. संबंधित विभागांनी वृक्ष लागवडीच्या या मोहिमेला प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज वृक्ष लागवडी संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागपूर वन विभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास, नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त
वैष्णवी बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी,
सहाय्यक वन संरक्षक यश काळे, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण एन. आर. राऊत यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, शिक्षण संस्था यामध्ये प्राधान्याने वृक्ष लागवड होण्याची गरज आहे. विभागाला उद्दिष्ट निश्चित करण्यात येणार असून संबंधित विभागाने उद्दिष्ट निश्चितीनंतर वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात यावे. सर्व संबंधित विभागांनी एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करून वनविभागाशी समन्वय साधण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.
वृक्षारोपण प्रामुख्याने त्या त्या भागांमधील भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन त्या भागात वाढ होऊ शकणाऱ्या स्थानिक प्रजातींची प्राधान्याने लागवड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी “हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र” या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करीता १ ० कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देशित केले आहे. त्यानुषंगाने राज्यात १० कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्याकरिता संबंधित विभागांशी सल्लामसलत करुन वृक्ष लागवड व संगोपनाचे नियोजन करण्यात येत असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे





