नागपूर ०७ – काळाच्या ओघात देशा-देशांमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे आयाम बदलले. युद्धांमध्येही अद्ययावत विकसित तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. आजची परिस्थिती बघता युद्धांच्या गर्तेत जगाला अहिंसेचा मंत्र देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मिहीर भागवत या १६ वर्षांच्या तरुणाने लिहिलेल्या ‘बियाँड बॉर्डर्स’ या इंग्रजी पुस्तकाचे गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक विषयावर अभ्यास करून अतिशय उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल गडकरी यांनी मिहीरचे कौतुक केले.
गडकरी म्हणाले, ‘आज जगात संघर्षाचे वातावरण आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमधील वाद पूर्णपणे संपलेला नाही. यामध्ये मानवतावादी दृष्टीकोन बाळगणे अधिक महत्त्वाचे आहे. अहिंसा प्रस्थापित होणे गरजेचे आहे. मिहीरने लहान वयात अध्ययन करून त्याचे चिंतन या पुस्तकात मांडले आहे. त्याबद्दल त्याचे विशेष कौतुक.’ यावेळी मिहीरचे पालक, नातेवाईक तसेच मित्रमंडळी उपस्थित होते.





