बेला :- स्वातंत्र्याच्या लढ्यात उल्लेखनीय काम केलेले स्वातंत्र्य संग्राम सैनिक क्रांतिवीर राजारामजी महाले यांचा ३९ वा स्मृतिदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांचे स्मृतिप्रित्यर्थ गावाबाहेरील प्रवेश चौकाचे राजारामजी महाले चौक ‘ असे नामकरण करण्यात आले.त्या स्मारकास पुष्पमाल्यार्पण करून महाले यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र महाले, सेवानिवृत्त शिक्षक रमेश भोयर, सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष वासुदेव कांबळे, मुकेश इटनकर, बंडू पाणबुडे,मयूर वलके, मोहन सहारे, राजू शेंडे, राजू भोजे प्रामुख्याने उपस्थित होते.
१९४२ च्या आंदोलनात महाले यांचा सक्रिय सहभाग होता.मोठ्या प्रमाणात जनजागृती करून स्वातंत्र्याचा लढा ते अविस्मरणीय लढले.गाव व परिसर पेटून उठल्याने त्यांनी तत्कालीन पोलीस ठाणे जाळून टाकले.ते सापडत नसल्याने इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी त्याकाळी १० हजार रुपयाचे बक्षीस ठेवले होते. तरीपण ते सापडले नाही. त्यांचे उल्लेखनीय कामामुळे जनतेनी त्यांना क्रांतिवीर उपाधी बहाल केली होती.स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांचा बेला व परिसरात सलग तीस वर्ष राजकीय धबधबा होता. त्यामुळे दोन पंचवार्षिक तत्कालीन जनपदचे ते सदस्य होते.एवढेच नव्हे तर ते उमरेड पंचायत समितीचे पहिले सभापती ठरले. जनता त्यांना आदराने ‘ नेताजी ‘ म्हणून संबोधत. त्यांचे स्मृतीप्रित्यर्थ गावाबाहेरील प्रवेश चौकास त्यांचे नाव देण्यात आले. व तिथे स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
विद्यालयाची केली स्थापना
बेलासह परिसरातील शालेय मुला,मुलींचे शिक्षणासाठी राजारामजी महाले यांनी शिक्षक यादवराव देशमुख यांचे सहकार्याने गावात लोकजीवन विद्यालयाची स्थापना केली.पूर्वी येथे सातवीपर्यंतच शिक्षण मिळत होते. त्यानंतरचे शिक्षण दुरापास्त होते. लोकजीवन शिक्षण संस्थेचे ते आजीवन अध्यक्ष होते.





