– निसर्ग आणि पृथ्वीलाही गुरु मानून तिचे रक्षण करा; प्राचार्य डॉ. गणेश कापसे यांचे आवाहन
हंसराज,भंडारा लाखनी :- येथील स्व. निर्धन पाटील वाघाये महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. गणेश कापसे होते. कार्यक्रमाची सुरुवात ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।’ या पारंपरिक श्लोकाच्या उच्चाराने करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. गणेश कापसे म्हणाले की, “गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्याला ज्ञान, संस्कार आणि मोक्षाचा मार्ग दाखवणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ असेही म्हणतात. आई-वडील हे आपले पहिले गुरु असून शिक्षक हे दुसरे गुरु आहेत. परंतु, ज्या धरतीवर आपण राहतो, त्या पृथ्वीलाही आपण आपले गुरु मानून तिचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.”
प्रमुख वक्त्या प्रा. मनीषा सपाटे यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. निसर्गाला आपले गुरु मानून त्याच्यावर प्रेम करा आणि निसर्गाची जोपासना करा, असा मूलमंत्र त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या वहीवर ‘ॐ’ काढून त्याचे पूजन केले आणि गुरूंप्रती आपला आदर व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वरी रहांगडाले यांनी केले, तर आभार प्रा. मंगेश कुकडे यांनी मानले. या कार्यक्रमाला डॉ. अनुराधा खाडे, प्रा. श्रद्धा बोरकर, प्रा. स्मिता तितरमारे, प्रा. कवी सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ‘या कुन्देन्दुतुषारहारधवला’ या प्रार्थनेने करण्यात आली.





