spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्यापूर्वी संजय राऊत यांनी संघाचा इतिहास आणि राष्ट्रसेवेचे योगदान समजून घ्यावे” – किशोर तिवारी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेली विधाने ही वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी, राजकीय पूर्वग्रहातून प्रेरित आणि जनतेची दिशाभूल करणारी आहेत. केवळ क्षणिक राजकीय लाभासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेल्या राष्ट्रनिष्ठ संघटनेला राजकीय वादात ओढणे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी प्रखर प्रतिक्रिया विदर्भ जनआंदोलन समितीचे संस्थापक अध्यक्ष व शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू घेण्यासाठी झालेली नाही. संघाचा मूलमंत्र आहे – राष्ट्र प्रथम, समाज प्रथम आणि संस्कृती प्रथम. गेल्या अनेक दशकांत संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी पूर, भूकंप, दुष्काळ, महामारी, सीमाभाग, वनवासी क्षेत्रे, सामाजिक समरसता, शिक्षण, सेवा आणि राष्ट्र जागरणाच्या असंख्य उपक्रमांत निःस्वार्थ योगदान दिले आहे. देशहितासाठी समर्पित अशा कार्याचा राजकीय चष्म्यातून अपमान करणे योग्य नाही.

एखाद्या राजकीय पक्षावर टीका झाली म्हणजे ती हिंदुत्वावर किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका ठरते, हा युक्तिवाद केवळ हास्यास्पदच नाही तर हिंदुत्वाच्या व्यापक विचारालाही कमी लेखणारा आहे. हिंदुत्व ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रवक्ता नाही.

संजय राऊत यांनी संघाच्या विचारांचा वारंवार विपर्यास करून राजकीय ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला आहे. मतभेद असणे स्वाभाविक आहे; परंतु इतिहासाचे विकृतीकरण करून संघाच्या राष्ट्रकार्यात शंका उपस्थित करणे हे सार्वजनिक जीवनातील जबाबदारीला साजेसे नाही. विचारांशी वैचारिक लढा द्यावा; परंतु संघाच्या राष्ट्रसेवेचा अवमान करून राजकीय गुण मिळविण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील सुजाण जनता ओळखते.

आज देशासमोर शेतकरी आत्महत्या, कृषी संकट, बेरोजगारी, ग्रामीण अर्थव्यवस्थेची पडझड, राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक ऐक्य यांसारखी गंभीर आव्हाने आहेत. अशा वेळी जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर भूमिका मांडण्याऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकीय लक्ष्य बनविणे हे जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचे राजकारण आहे.

मी स्वतः बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलो आहे. राष्ट्रभक्ती, शिस्त, सामाजिक बांधिलकी, सेवा आणि शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा मला संघाच्या कार्यातून मिळाली. आदिवासी, दलित, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण समाजाच्या न्यायासाठी गेली तीन दशके मी करत असलेला संघर्ष हाच त्या संस्कारांचा विस्तार आहे.

संजय राऊत यांनी संघावर राजकीय टीका करण्यापूर्वी संघाचे तत्त्वज्ञान, इतिहास आणि राष्ट्रकार्यातील योगदानाचा प्रामाणिक अभ्यास करावा. मतभेद असू शकतात; परंतु राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे सातत्याने चुकीचे चित्र उभे करणे हे लोकशाहीतील वैचारिक प्रामाणिकतेला धरून नाही.

– किशोर तिवारी संस्थापक अध्यक्ष, विदर्भ जनआंदोलन समिती (VJAS) शेतकरी नेते व कृषी धोरण अभ्यासक


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.