भंडारा :- जिल्ह्यात रस्ते अपघातातील वाढती जीवितहानी रोखण्यासाठी भंडारा पोलीस प्रशासनाने एक आदर्श पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी चालवताना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य केले आहे. “समाजाला नियम सांगण्यापूर्वी पोलीस दलाने स्वतः नियमांचे पालन करून आदर्श निर्माण करावा,” हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
भीषण आकडेवारीमुळे प्रशासनाचा निर्णय सन २०२५ मध्ये दुचाकी अपघातात हेल्मेट न वापरल्यामुळे तब्बल ९७ नागरिकांना आपला जीव गमवावे लागला, तर १२५ जण गंभीर जखमी झाले. यातील बहुतांश मृत्यू हे डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे झाले आहेत. ही भीषण परिस्थिती पाहता, पोलीस विभागाने आता ‘मिशन हेल्मेट’ हाती घेतले आहे. पोलिसांच्या या मोहिमेला कर्मचारी वर्गातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
नागरिकांना आवाहन केवळ दंडाच्या भीतीने नव्हे, तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने दुचाकी चालवताना नेहमी ‘ISI’ मानांकित हेल्मेटचाच वापर करावा. रस्ते सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची बांधिलकी आहे, असे जाहीर आवाहन भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.





