– महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियानांतर्गत जनजागृतीवर भर; १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देण्याच्या सूचना
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी
नवेगावबांध :- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र अंमली पदार्थ मुक्त अभियान व शून्य सहनशीलता धोरण प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजेदरम्यान नवेगावबांध पोलीस स्टेशन येथे कार्यक्षेत्रातील शाळा व महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी शाळा स्तरावर व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम, प्रबोधनपर उपक्रम, व्याख्याने तसेच पालकांच्या सहभागातून जनजागृती वाढविण्यावर भर देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचे पत्र उपस्थित मुख्याध्यापकांना देण्यात आले. त्यानुसार, येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये “व्यसनमुक्त विद्यार्थी – व्यसनमुक्त महाराष्ट्र” ही प्रतिज्ञा विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
बैठकीस नवेगावबांध पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील एकूण ३६ शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शासनाच्या व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला यशस्वी करण्यासाठी शिक्षण संस्था, पोलीस प्रशासन, पालक आणि समाज यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांना व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवून निरोगी, सुदृढ आणि जबाबदार पिढी घडविण्यासाठी अशा जनजागृती बैठका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





