नागपूर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या विभागातील 70 हजार 290 लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात 544 कोटी 70 लक्ष 54 हजार इतकी रक्कम ऑनलाईन पोर्टलद्वारे थेट कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आधार प्रमाणीकरण झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात ऑनलाईन पोर्टलद्वारे कर्जमुक्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकरी लाभार्थ्यांना तातडीने खरीप पिक कर्ज वाटप करण्यासंदर्भात सर्व बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात लाभाची रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे. राज्यातील 6.22 लाख पात्र लाभार्थी खातेदाराच्या कर्जखात्यात रक्कम ऑनलाईन पोर्टलद्वारे थेट संबंधित लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर हस्तांतरित करण्यात आली आहे.
शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत नागपूर विभागातील आधार प्रमाणीकरण झालेल्या 70 हजार 290 लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात 544 कोटी 70 लक्ष 54 हजार 130 रुपये एवढी रक्कम पोर्टल द्वारे जमा करण्यात आली असून यामध्ये सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 26 हजार 229 शेतकऱ्यांच्या खात्यात 198 कोटी 59 लाख 48 हजार रुपयाची रक्कम जमा झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 11 हजार 696 लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात 75 कोटी 25 लक्ष 81 हजार रुपये, वर्धा जिल्ह्यातील 10 हजार 635 लाभार्थ्यांच्या खात्यात 109 कोटी 91 लक्ष 16 हजार रुपये, नागपूर जिल्ह्यातील 6 हजार 380 लाभार्थ्यांच्या खात्यात 70 कोटी 61 हजार, गोंदिया जिल्ह्यातील 12 हजार 679 लाभार्थ्यांच्या खात्यात 75 कोटी 74 लक्ष 73 हजार रुपये, तर गडचिरोली जिल्ह्यातील 2 हजार 671 लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात 15 कोटी 18 लक्ष 72 हजार रुपये ऑनलाईन पोर्टलद्वारे थेट खात्यात जमा करण्यात आले आहे.





