spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

श्री गुरू तेग बहादूर जी यांचे सर्वोच्च बलिदान मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

– नवी मुंबईत ‘श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा’ विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र उत्साहात संपन्न; राज्यातील विद्यापीठात ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ सुरू करण्याचे राज्यपालांचे आवाहन

नवी मुंबई :- इतर धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरू तेग बहादूर जी यांचे जीवन हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून आधुनिक धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. तसेच राज्यातील विद्यापीठात ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ सुरू करण्याचे राज्यपालांनी आवाहन केले.

श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पंजाब हेरिटेज भवन येथे आयोजित ‘श्री गुरू तेग बहादूर जी यांचा वारसा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई महानगर पालिकेच्या महापौर सुजाता पाटील, मा.राज्यपाल महोदयांचे सचिव डॉ.प्रशांत नरनावरे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्षा कुमुद शर्मा, हरियाणा साहित्य आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष कुलदीप चंद्र अग्निहोत्री, साहित्य अकादमीचे सचिव वरुण गुलाटी, , प्रशासक तख्तश्री अबचल नगर, हुजूर साहिब विजय सतबीर सिंह, मा.राज्यपाल महोदयांचे संयुक्त सचिव एस रामामूर्ति यांच्यासह साहित्यिक, विद्वान आणि सिख समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महामहिम राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भाषणाच्या सुरुवातीस महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमधील शतकानुशतकांच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक नात्याचा गौरव केला. महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या भूमीतून संत नामदेव महाराज भक्तीचा संदेश घेऊन पंजाबमध्ये गेले होते, ज्यांच्या पवित्र रचना आजही ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’ मध्ये आदरपूर्वक विराजमान आहेत, याची आठवण त्यांनी करून दिली. तसेच कालंतराने श्री गुरू गोविंद सिंग जी महाराष्ट्रातील नांदेड येथे आले आणि तेथे स्थापित ‘तख्त श्री हजूर साहिब’ हे दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष देत आहे, असे सांगताना राज्यपाल म्हणाले की महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी ‘जुळी राज्ये’ आहेत.

श्री गुरू तेग बहादूर जी यांनी १६७५ मध्ये दिलेले सर्वोच्च बलिदान हे भारताच्या नागरी आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत अद्वितीय आणि प्रेरणादायी अध्याय असल्याचे सांगत राज्यपालांनी अधोरेखित केले की, गुरूंनी केवळ स्वतःच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर प्रत्येक मानवाला भीतीशिवाय आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे या सार्वभौम मूल्यासाठी ‘हिंद दी चादर’ बनून प्राणाहुती दिली. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये शतकांआधीच गुरूजींनी आपल्या जीवनकार्यातून प्रत्यक्ष जगून दाखवली होती. आजच्या सामाजिक आणि मानसिक ताणतणावाच्या काळात गुरूजींची शिकवण आपल्याला आंतरिक शक्ती, नम्रता, करुणा आणि निष्काम सेवेची दिशा दाखवते.

गुरूजींचे विचार केवळ चर्चासत्रांपुरते मर्यादित न ठेवता ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगत राज्यपालांनी एक महत्त्वाची शिफारस केली. महाराष्ट्रात असलेल्या ६५ सार्वजनिक व खाजगी विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात ‘श्री गुरू तेग बहादूर अध्यासन’ (Chair) स्थापित करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे अध्यासन आंतरधर्मीय संवाद, संशोधन, अध्यापन आणि गुरूजींच्या विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याच्या संदेशाचा प्रचार-प्रसार करणारे कायमस्वरूपी केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साहित्य अकादमी आणि पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे राज्यपालांनी मनःपूर्वक कौतुक केले.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रसंगी दिलेल्या ध्वनी संदेशात म्हटले आहे की, श्री गुरू तेग बहादूर जी यांचे बलिदान हे कोणालाही भयभीत न करता कोणाच्याही भयापुढे न झुकणाऱ्या खऱ्या ज्ञानाचे आणि मानवी स्वातंत्र्याचे अमर प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या ऐतिहासिक ३५० व्या शहादत दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना गुरूजींच्या महान त्यागातून आणि अमूल्य संदेशातून निरंतर प्रेरणा मिळावी. गुरूजींचे विचार हे क्षेत्र, भाषा आणि समुदायाच्या सीमा ओलांडून एकता, साहस, करुणा आणि सेवेवर आधारित ‘विकसित भारत’ घडवण्याचा राष्ट्रीय संकल्प पुन्हा दृढ करणारे आहेत.

हरियाणा साहित्य आणि संस्कृती अकादमीचे अध्यक्ष डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री यांनी आपल्या भाषणात “धर्मो रक्षति रक्षितः” या सनातनी मूल्याचा उल्लेख करत, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट आले तेव्हा श्री गुरू तेग बहादूर जींसारख्या महापुरुषांनी दिलेल्या बलिदानामुळेच भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून अखंड टिकून असल्याचे प्रतिपादन केले. गुरू नानक देव जींपासून सुरू झालेल्या ध्येयनिष्ठ परंपरेचा मागोवा घेत त्यांनी स्पष्ट केले की, अन्यायाविरुद्ध न झुकता दिलेल्या याच बलिदानातून पुढे ‘खालसा पंथा’ची स्थापना झाली. संपूर्ण भारताला एका सूत्रात बांधणाऱ्या या चळवळीत देशाच्या कानाकोपऱ्यातील ‘पंच प्यारे’ सहभागी झाले होते, ज्यांचा हा वारसा आजच्या अनेक राष्ट्रीय समस्यांचे निवारण करण्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात “हिंद दी चादर” श्री गुरू तेग बहादूर जी यांच्या बलिदानाचे आणि संरक्षणाचे स्मरण करत, गुरू महाराजांची परंपरा मानवाला समाधीकडून शहादतीकडे आणि शहादतीकडून समाधीकडे नेणारा मार्ग दाखवते असे प्रतिपादन केले. गुरूजींच्या ३५० व्या शहादत दिनानिमित्त देशभरातील पाच प्रमुख केंद्रांमध्ये आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रांच्या मालिकेतील हे तिसरे पुष्प महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत गुंफण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जगातील सर्व साहित्यिक आणि इतिहासकार गुरूजींच्या या अजोड बलिदानाचा आदर करतात असे सांगत, ज्या महान संस्कृतीची हस्ती जगात कधीही मिटली नाही त्या समृद्ध वारशाचे आपण सर्व वाहक आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा प्रा. कुमुद शर्मा यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात, संतांच्या जीवनमूल्यांचा वारसा आणि श्री गुरू तेग बहादूर जी यांचे सर्वोच्च बलिदान आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या राज्यपालांच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. देशातील संतांनी स्व-जीवनातून समरसतेचा आणि त्यागाचा संदेश दिला असून, हा महान वारसा केवळ इतिहास न राहता वर्तमानाशी जोडणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.